Thursday 6 December 2018

भारतातील होम-स्टे पर्यटन: सध्याची स्थिती आणि भविष्यातील संधी


आपल्यापैकी बऱ्याच जणांना होम-स्टे नावाचा प्रकार ऐकून किंवा अनुभवून माहिती असेल. पर्यटकाची राहण्याची आणि खाण्याची सोय यजमानाकडून काही एका मोबदल्यात स्वतःच्या घरातच केली जाणे असे या प्रकाराचे थोडक्यात वर्णन करता येईल. गरजू विद्यार्थ्यांनी एखाद्याच्या घरातच राहणे आणि तिथे त्यांची खाण्या-पिण्याची सुद्धा व्यवस्था काही एक मोबदला घेऊन केली जाणे ही पेइंग गेस्ट नावाची पद्धत आपल्याला परिचयाची आहे. तसेच एखादे कुलदैवताचे ठिकाण असेल किंवा पिढीजात असे नेहमी भेट देण्याचे तीर्थस्थळ असेल तर अशा ठिकाणी सहकुटुंब जाणे आणि तिथे  राहणे, खाणे, आणि दर्शन या सगळ्या सोयी नेहमीच्या पुजारी कुटुंबियांकडून एकत्रितपणे केल्या जाणे हीदेखील एक पारंपारिक आणि परिचित अशी पद्धत आहे. या दोन्ही पद्धती आपल्या इथले जुने होम-स्टेचेच प्रकार मानता येतील.

सध्या जगभर होम-स्टे टुरिझमचा चांगलाच बोलबाला आहे. एअरबीएनबी, ट्रीपअॅडवायझर यासारख्या वेब बेस्ड प्लॅटफॉर्म्स मुळे एकूण जगभरच पर्यटन व्यवसायाची गणिते पूर्णपणे बदललेली आहेत. एअरबीएनबीने प्रकाशित केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०१७ सालात जगभरच्या एअरबीएनबी मार्फत होम-स्टे चालवणाऱ्या स्त्री व्यावसायिकांनी १० बिलियन डॉलरचा (साधारण ७२,५०० कोटी रुपये) व्यवसाय केला. एअरबीएनबीचा प्लॅटफॉर्म वापरणाऱ्यांमध्ये स्त्री व्यावसायिकांचे प्रमाण ५५% आहे हे लक्षात घेता आणि एअरबीएनबी हा अनेक प्लॅटफॉर्मपैकी एक आहे हे लक्षात घेता, सध्या होम-स्टे प्रकारातून जगभर किती मोठ्या प्रमाणात पर्यटन-व्यवसाय केला जातो आहे हे लक्षात येते.

आपण आधी एअरबीएनबीचेच उदाहरण घेऊ यात. जिला कुणाला आपले घर काही दिवसांसाठी भाड्याने द्यायचे आहे आणि ज्यांना ते तसे हवे आहे अशांना एकत्र आणण्याचे काम ही कंपनी आपल्या वेबसाईटमार्फत करते. भाड्याने द्यायच्या घराची अतिशय सविस्तर माहिती फोटोंसहित वेबसाईटवर उपलब्ध असते. समजा कुणाला पॅरीसमध्ये होम-स्टे बुक करायचा असेल तर पॅरीस नाव टाकून सर्च केल्यानंतर त्या शहरातले एअरबीएनबी वर रजिस्टर झालेले सगळे होम-स्टे दिसायला लागतात. होम-स्टेचे भाडे ऑनलाईन भरण्याची सोय असते. घरात राहून गेलेली लोकं घराबद्दल सविस्तर फीडबॅक (युझर रेटिंग्ज) देतात. सुयोग्य होम-स्टेची निवड करताना अशा सगळ्या युझर रेटिंग्जचाच वापर केला जातो. घर भाड्याने देणारी लोकं पण घरे वापरणाऱ्या पर्यटकांना रेटिंग्ज देतात.

नुकताच आम्ही युरोपमधल्या काही देशांचा दौरा केला. सगळ्याच ठिकाणी आम्ही होम-स्टे मध्ये राहिलो. सगळी बुकिंग्ज आम्ही एअरबीएनबी मार्फत केली. आम्ही पाचजण असल्यामुळे आम्हाला दोन बेडरूमचे फ्लॅट्स सोयीचे पडत असत. सुसज्ज किचनची सोय असे. फ्लॅटचे भाडे पाचजणांमध्ये विभागल्यावर हॉटेलच्या तुलनेत बरेच स्वस्त असे. शिवाय सकाळी निघताना हवा तसा नाश्ता करून निघण्याची सोय असे. बाथरूममध्ये आणि इतर सगळ्याच खोल्यांमध्ये हॉटेलात ज्या वस्तू आणि सुविधा दिलेल्या असतात (साबण, शांपू, टॉवेल, बेडशीट्स, इ.) त्या सगळ्या गोष्टींची तजवीज केलेली असे. 

स्वित्झर्लंड मधील ब्रिएन्झ या गावातला एक होमस्टे 
बऱ्याच ठिकाणी तर हॉटेलात खोल्या जशा सजवून तयार असतात तसे घर सजवून तयार असे. होम-स्टे चालवणारी मंडळी युझर रेटिंग्ज मध्ये नकारात्मक टिप्पण्या आणि रेटिंग्ज मिळू नये यासाठी दक्ष असत. परिणामी सगळ्याच गोष्टींमध्ये एक व्यावसायिक दृष्टी आणि शिस्त जाणवली. नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी जवळपासच्या सुपरमार्केटमध्ये जावे लागे. शिवाय होम-स्टे हे रहिवासी वस्तीत असत. त्यामुळे आपोआपच स्थानिक लोकांशी जास्त संपर्क आला. या अनुभवावरून आमच्या हे लक्षात आले की युरोप आणि अमेरिकेत वेबसाईटवरून बुकिंग करून होम-स्टे मध्ये राहणे आता चांगलेच रूढ झालेले आहे. होम-स्टेचा पर्याय तिकडे हॉटेल इतकाच खात्रीशीर आणि सुरक्षित मानला जातो आहे. भारतात मात्र हा प्रकार हळूहळू रुजतो आहे
.
केरळात पेरियार नदीच्या काठी असलेल्या थट्टेकड नावाच्या छोट्या गावाजवळ सलीम अली पक्षी अभयारण्य आहे. काही वर्षांपूर्वी तिथे जाताना आम्ही तिथल्या एका होम-स्टे मध्ये ऑनलाईन बुकिंग केले होते. ट्रीपअॅडवायझरच्या वेबसाईट वरती आम्हाला या घराची माहिती मिळाली. अनेक पर्यटकांनी घराबद्दल आणि घरमालकाबद्दल खूप चांगले रिव्ह्यूज लिहिले होते. एका मुक्कामाचे पूर्ण पैसे आधीच ऑनलाईन भरून आम्ही तिथे रहायला गेलो. 

थट्टेकड येथील होम-स्टे 
खालच्या मजल्यावर घरमालक स्वतः सहकुटुंब राहत होता आणि वरच्या दोन खोल्या त्याने पर्यटकांसाठी राखून ठेवल्या होत्या. भारतात फिरताना पहिल्यांदाच आम्ही होम-स्टेचा पर्याय वापरत असल्याने थोडी काळजी वाटत होती. पण इतक्या छोट्या गावातला होम-स्टे असूनही सगळं अगदी मनाजोगतं झालं. घरमालक हा उत्तम पक्षीनिरीक्षक आणि गाईड होता. त्याने सुयोग्य मोबदला आकारून आम्हाला तिथले दुर्मिळ पक्षी दाखवले आणि उत्तम माहिती पण सांगितली. घरगुती जेवणाची सोय उत्तम होती. खास केरळी पदार्थ चाखायला मिळाले. खोल्या स्वच्छ आणि नीटनेटक्या होत्या. किमान आवश्यक अशा सगळ्या गोष्टी होत्या. भारतात अगदी रिमोट ठिकाणीदेखिल होम-स्टे यशस्वीपणे चालवला जाऊ शकतो याचे जणू काही प्रात्यक्षिकच आम्हाला बघायला मिळाले.  
 
भारतात मुंबई, दिल्ली, चेन्नई, यासारख्या मोठ्या शहरांमध्ये युरोप अमेरिकेप्रमाणे घरे होम-स्टे पद्धतीने भाड्याने देण्याची पद्धत पसरते आहे. शिवाय शहरातलेच लोक ‘हौस अधिक व्यवसाय’ या दोन्ही कारणांनी निसर्गरम्य ठिकाणी घरे बांधून होम-स्टे पद्धतीने भाड्याने देताना दिसतात. कोकणातल्या किनारपट्टीवरच्या गावातले अनेक होम-स्टे हे शहरी चाकरमान्यांच्या मालकीचे असतात. याशिवाय दुर्गम भागातल्या पर्यटनस्थळी स्थानिक रहिवासी देखिल होम-स्टे पद्धतीच्या सोयी पुरवताना दिसतात. राजमाची, भंडारदरा या सह्याद्रीतल्या ठिकाणांमध्ये, हिमालयातल्या सुंदर पण दुर्गम परिसरात तसेच लेह-लडाख परिसरात होम-स्टे रुजताना दिसताहेत. कमालीचे सांस्कृतिक वैविध्य असणाऱ्या आपल्या देशात स्वतःच्या घरामध्ये रहावयास जागा देऊन पाहुण्यांचे आतिथ्य करण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे होम-स्टे टुरिझमच्या वाढीसाठी आपल्या देशात भरपूर वाव आहे. एका आकडेवारीनुसार भारतात पर्यटन क्षेत्रास दरवर्षी दोन लाखखोल्यांचा तुटवडा भासतो. अशावेळी ही कसर होम-स्टे टुरिझम मार्फत भरून काढणे सहज शक्य आहे. भारतातले सध्याचे पर्यटन धोरण मात्र मोठ्या प्रकल्पांना महत्त्व देणारे आहे.

शहरात आढळणारे तसेच वरती उल्लेखलेले होम-स्टे ही सगळी व्यक्तिगत होम-स्टेची उदाहरणे झाली. या शिवाय अनेक ठिकाणी कम्युनिटी होम-स्टे सुद्धा आढळतात. कम्युनिटी होम-स्टेमध्ये पर्यटकांना राहण्यासाठी दिलेल्या घरे अथवा खोल्यांची मालकी किंवा व्यवस्थापन हे त्या कम्युनिटी मार्फत केले जाते. ही कम्युनिटी म्हणजे एखादा आदिवासी पाडा असू शकतो किंवा एखादे गाव असू शकते. यातून पर्यटकांना संपूर्ण गावाचा सांस्कृतिक अनुभव मिळणे अपेक्षित असते. स्थानिक संस्कृतीची जवळून ओळख व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. स्थानिक नृत्य पाहणे आणि शिकणे, स्थानिक खाद्यपदार्थ तसेच हस्तकलांचा आस्वाद घेणे, भातलावणीत सहभागी होणे, बैलगाडीतून फेरी मारणे यासारख्या गोष्टी यामध्ये मोडतात. व्हिएतनाम, कंबोडिया यासारख्या देशांमध्ये कम्युनिटी होम-स्टेचा एकंदर पर्यटनात प्रभावी वापर केलेला दिसतो.

Image result for korzok homestay wwf
कोर्झोक (फोटो इन्टरनेट वरून)
ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांनी कम्युनिटी होम-स्टेचे प्रकल्प यशस्वीपणे राबवलेले दिसतात. लडाख भागातील कोर्झोक या ठिकाणी WWF-India या संस्थेमार्फत चालवला जाणारा कम्युनिटी होम-स्टे हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. WWF चे लोक, स्थानिक बौद्ध मठातले भिख्खू आणि गावातले पुढारी यांच्या सहभागाने एका ट्रस्टची स्थापना केली गेली. हा ट्रस्ट कम्युनिटी होम-स्टेचे कामकाज पाहतो. गावात राहणाऱ्या लोकांच्या घरातल्याच काही खोल्या होम-स्टे साठी वापरल्या जातात. हा सगळा दुर्गम परिसर असल्यामुळे पर्यटकांची जेवणाची सोय तसेच गाईड्सची तजवीज हे सगळं स्थानिक गावकऱ्यांमार्फत होतं. वेगवेगळ्या देशातले दर्दी पर्यटक इथल्या उत्तम पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या होम-स्टे मध्ये अनेक वर्षांपासून येत असतात.


भारतासमोर सध्या असलेली सगळ्यात बिकट समस्या ही बेरोजगारीची आहे. होम-स्टे पर्यटन हा शहरी तसेच ग्रामीण बेरोजगारीवरचा प्रभावी उपाय ठरू शकतो. भारताच्या पर्यटन विकासाच्या धोरणांमध्ये मात्र होम-स्टेचा ओझरता उल्लेख दिसतो. इनक्रेडिबल इंडिया बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम ही होम-स्टे टुरिझमच्या विकासासाठीची भारतातली एकमेव योजना आहे. कम्युनिटी होम-स्टे साठीच्या उपक्रमांचा किंवा स्कीमचा तर उल्लेखही धोरणात आढळत नाही. होम-स्टे टुरिझम मुळातच अनऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये मोडत असल्याने त्याद्वारे नेमका किती रोजगार तयार होतो आणि जीडीपीमध्ये किती भर पडते याचा वेगळा हिशोब ठेवला जात नाही. त्यामुळे देखील होम-स्टे टुरिझमचा तितक्या गांभीर्याने विचार केला गेला नसावा. शिवाय गावपातळीवरच्या विकेंद्रित विकास योजनांविषयीचा भारतातला आत्तापर्यंतचा अनुभव तितका उत्साहवर्धक नाही हेही एक कटू सत्य आहे.

होम-स्टे पर्यटनाचा विकास घडवून आणण्यासाठी शासनाने केंद्र आणि राज्य पातळीवर विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. नफ्याच्या उद्देशाने चालणारे आणि धंदेवाईक स्वरूप असलेले उपक्रम शासन स्वतः चालवू शकत नाही हे आता सिद्ध झालेले आहे. त्यामुळे याबाबतीत शासनाने खाजगी क्षेत्रातल्या यशस्वी प्रयोगांना पाठबळ देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कृषी-पर्यटनाच्या क्षेत्रात Agri Tourism Development Corporation (एटीडीसी) ही पांडुरंग तावरे यांनी स्थापन केलेली पुणे स्थित कंपनी महत्वाचे काम करत आहे. महाराष्ट्रातली जवळपास सव्वातीनशे कृषीपर्यटन केंद्रे एटीडीसीशी संबंधित आहेत. शेतीमालकांनी सुरु केलेल्या या कृषीपर्यटन केंद्रांना मार्केटिंग, जाहिरात, ब्रँडींग तसेच इतर सल्ला अशा सुविधा एटीडीसी काही एक मोबदला घेऊन पुरवते. कृषी-पर्यटन होम-स्टे ला जवळचे असल्याने एटीडीसीच्या या कार्यपद्धतीचा होम-स्टे च्या वाढीसाठीच्या योजना राबवताना उपयोग होऊ शकतो.

गौतमी नावाच्या उद्योजिकेने चेन्नईत सुरु केलेल्या Travel Another India (टीएआय) या खाजगी कंपनीची कार्यपद्धतीदेखिल उद्बोधक आहे. होम-स्टे मालकांच्या व्यवसायाचा व्याप छोटा असल्याने त्यांची मार्केटिंगसाठीची आर्थिक ऐपत नसते. शिवाय पर्यटन व्यवसायासाठी लागणारी खास कौशल्ये त्यांच्याकडे नसतात. टीएआय त्यांना मार्केटिंगसपोर्ट सोबतच होम-स्टे साठी आवश्यक अशा कौशल्यांचे व्यवसाय प्रशिक्षण ही देते. याबदल्यात होम-स्टे मालकांच्या उत्पन्नातला ठराविक वाटा टीएआयला मिळतो.

महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या होम-स्टे पर्यटनाचे अनुभव या पार्श्वभूमीवर पाहण्यासारखे आहेत. रतनवाडी आणि सामरद या भंडारदरा परिसरातल्या गावात आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी ग्रामस्थांना होम-स्टे साठीची छोट्या आकाराची उत्तम घरे बांधून दिलेली आहेत. 

रतनवाडी येथील आदिवासी विकास विभागाने बांधून दिलेला होम-स्टे 
या घरांपैकी एका ठिकाणी आम्ही मुक्काम केला होता. पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने हा सगळा परिसर खरं तर अतिशय समृद्ध आहे. भंडारदरा धरण, रतनगड, संधान व्हॅली, अशी सुंदर ठिकाणं या परिसरात आहे. पण एका सर्वेक्षणानुसार इथल्या चाळीस टक्के होम-स्टे मालकांचे उत्पन्न महिना पाच हजार पेक्षा कमी आहे. सगळ्याच लोकांचा मुख्य व्यवसाय अजूनही शेती हाच आहे. आमचा इथल्या होम-स्टेमध्ये राहण्याचा अनुभव तितका आरामदायी नव्हता. होम-स्टे साठीच्या खोल्यांची स्वच्छता आणि पर्यटकांसाठीच्या सोयी-सुविधा याबाबतीत हलाखीची परिस्थिती होती. एकूणच  व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव आणि भांडवली निधीची कमतरता यासारख्या गोष्टी हलाखीस कारणीभूत असाव्यात. पैसे नाहीत म्हणून सुविधांचा दर्जा वाईट आणि त्यामुळे मिळणारे उत्पन्न कमी आणि उत्पन्न कमी असल्याने सुविधा सुधारण्यासाठी पैसे नाहीत असे दुष्टचक्र दिसून आले. बारी आणि रतनवाडी या गावात तर ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेला निधी भक्तनिवासासारख्या इमारती बांधण्यासाठी वापरलेला आढळला. 

 बारी येथील भक्तनिवास इमारत 
उपलब्ध निधीतून होम-स्टे पर्यटनास पूरक ठरू शकतील अशा सुविधा विकसित करण्याऐवजी वायफळ इमारतींवर खर्च करणे यातून गावनेतृत्वाकडे सुयोग्य दृष्टीचा कसा अभाव आहे हे दिसून आले.

तुलनेत हरिहरेश्वर, दिवेआगर आणि श्रीवर्धन या कोकणातल्या गावांमध्ये मात्र वेगळी परिस्थिती आहे. या ठिकाणी एकूणच स्वच्छता, नीटनेटकेपणा, व्यावसायिक दृष्टीकोन, सेवा पुरवण्यातला खात्रीशीरपणा उजवा होता. इथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघही भरपूर आहे. इथल्या होम-स्टे चालकांना कुठल्याही सरकारी स्कीमचा फायदा मिळत नाही. उलट बँकेची कर्जे काढून होम-स्टे विकसित करण्याची पद्धत इथे दिसून येते. तरीही उच्च उत्पन्न गटातल्या भारतीय पर्यटकांना तसेच परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याइतपत मजल अजून इथल्या होम-स्टेनी मारलेली नाही.

श्रीवर्धन येथील होम-स्टे 
कोकणातली गावे आणि कळसुबाई-भंडारदरा परिसरातील गावे या मधल्या होम-स्टेची तुलना करता काही महत्वाचे मुद्दे लक्षात येतात. कोकणातल्या गावात शहरीकरणाचे आणि साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. ही आता छोटी शहरेच झालेली आहेत. तिथल्या होम-स्टे मालकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा उजवी आहे. याचाच परिणाम म्हणून कोकणातल्या गावात होम-स्टेचा व्यवसाय जास्त व्यावसायिक, फायदेशीर आणि चांगल्या पद्धतीने चालवला जातो. शहरीकरणातून जो वृत्तीबदल होतो तो केवळ सरकारी अनुदानातून आणि मदतीतून होण्याची खात्री नसते. कोकणातल्या गावांमध्ये पर्यटकांचा जो ओघ येतो तो काही प्रमाणात किनारपट्टीतल्या (coastal circuit) इतर पर्यटन स्थळांचा परिणाम म्हणून सुद्धा येतो. कोकण किनारपट्टीकडे एक सिंगल-डेस्टिनेशन म्हणूनच जणू काही बघितले जाते. परिणामी किनारपट्टीवरील सगळ्याच पर्यटनस्थळांना जास्तीच्या पर्यटकांचा पुरवठा होतो. कळसुबाई-भंडारदरा परिसरातील गावांचे असे नाही. या ठिकाणी येणारे पर्यटक दुसर्‍या कुठल्या ठिकाणाहून फिरत फिरत इथे आले असे होत नाही. सह्याद्रीचे किंवा पश्चिम घाटाचे एक सिंगल-डेस्टिनेशन म्हणून ब्रँडींग आणि मार्केटिंग होणे कसे आवश्यक आहे हेदेखील या तुलनेतून लक्षात येते.

ग्रामीण आणि दुर्गम भागातले होम-स्टे तिथल्या स्थानिक लोकांकडून चालवले जात असल्याने मिळणाऱ्या उत्पन्नाचा सगळा वाटा तर स्थानिकांना जातोच शिवाय पर्यावरणाच्या हानीचे प्रमाणही मर्यादित राहते. इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रांमध्ये तर होम-स्टे पर्यटन हा अगदीच रास्त पर्याय ठरू शकतो. या कारणानेच महाराष्ट्रात वनखात्यातर्फे काही अभयारण्यांच्या क्षेत्रात होम-स्टे बांधण्यासाठी ग्रामस्थांना अनुदान देण्याची योजना आखलेली आहे. अशा प्रकारे चिरस्थायी विकासाच्या संकल्पनेशी नाते सांगणारा आणि पर्यटनाचा खोलवरचा आणि खराखुरा आनंद देणारा पर्यावरणस्नेही पर्याय म्हणून होम-स्टे टुरिझम अनेकांना आवश्यक वाटतो आहे. रोजगारनिर्मितीची पुरेपूर क्षमता असणाऱ्या, ग्रामीण भागात संपत्ती-निर्मितीच्या शक्यता निर्माण करणाऱ्या आणि पर्यावरणस्नेही विकास घडवू शकणाऱ्या होम-स्टे पर्यटनाचे महत्व वेळीच ओळखून योग्य ती पावले उचलली जाणे आवश्यक आहे.

                                                    (पूर्वप्रसिद्धी: हेमांगी दिवाळी २०१८)

Tuesday 23 October 2018

किमया: अभिवाचनाचा सुंदर आणि अनोखा प्रयोग


नुकताच अतुल पेठे  आणि अमोल चाफळकर यांनी सादर केलेला ‘किमया’ नावाचा अभिवाचनाचा प्रयोग बघितला. ‘किमया’ या माधव आचवलांच्या पुस्तकातल्या निवडक मजकुराचे नाटकवाल्यांनी संगीत, प्रकाश, मांडणीशिल्प, प्रत्यक्ष वास्तू-अनुभव यांच्या सहाय्याने केलेले अनोखे वाचन असे या प्रयोगाचे वर्णन करता येईल. किमया हा १९६१ साली प्रकाशित झालेला माधव आचवलांच्या ललितनिबंधांचा संग्रह आहे. आपल्या रोजच्या जगण्यात सौंदर्याचा आस्वाद कसा घेतला जाऊ शकतो याचे सुंदर वर्णन या पुस्तकात आहे. रंग, गंध, अवकाश, घनाकार, प्रकाश, पाणी याबाबतच्या सौंदर्यपूर्ण संवेदनांच्या विसरलेल्या विश्वाची नव्याने ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. यातले लिखाण आसमंतातल्या सगळ्याच गोष्टींना जरी कवेत घेत असले तरी वास्तुकलेचा विचार यात प्राधान्याने आहे. अर्धशतकाहून जास्त काळापूर्वी लिहिलेले असले तरी हे पुस्तक आजही तितकेच प्रस्तुत आहे. 

किमया हे तसे वैचारिक गाभा असलेले ललित स्वरूपाचे लेखन आहे. सौन्दर्यविचार, जो अन्यथा वाचायला जड आणि कष्टप्रद वाटू शकतो, तो आचवलांनी भाषिक हुकमतीच्या जोरावर सुलभ आणि रसदार केला आहे. लिखित भाषेच्या मर्यादा लांघण्याचे त्यांचे प्रयत्न पुस्तकात दिसत राहतात. पुस्तकात एके ठिकाणी आचवल लिहितात, “पहिला झुरका आत ओढताना जो असा वर खेचलेला आवाज येतो, तो लिहायचा असला तर कसा लिहिणार? काय पण भाषा आहे? खरे म्हणजे आपण सरळ ओळीत का लिहितो? ओळीसुद्धा शब्दांच्या नादाबरोबर वर-खाली व्हायला हव्या.” अतुल पेठेंच्या प्रयोगात आचवलांचा विचार भाषेच्या बंधनातून मोकळा करत पोहोचवण्याचा एक उत्कृष्ट प्रयत्न आहे. सौंदर्यविचार व्यक्त करत असताना आचवलांना आवश्यक वाटलेली सुलभता आणि रसपूर्णता या प्रयोगात पुरेपूर खुलवलेली आहे. 


संदेशवहनाची मूळ पद्धत खरं तर मौखिकच होती. जे सांगायचं ते पुस्तकात छापणे आणि लोकांनी ते वाचणे ही सोयीसाठी केलेली तडजोड आहे. अर्थात या तडजोडीचे म्हणून खास असे काही फायदेही असणारच. जसे की छापलेले वाचताना, वाचक हवे तिथे विश्राम घेऊ शकतो, विचारात बुडू शकतो आणि अशा प्रकारे स्वतःच्या या स्वातंत्र्याचा उपयोग करून तो स्वतःपुरती त्या संहितेची वेगळीच निर्मिती करू शकतो. अभिवाचनाच्या या प्रयोगात  पुस्तकातला भाग हवा तसा जोडून घेऊन, हवे तसे पॉझेस घेऊन, हव्या त्या पद्धतीने संगीत, प्रकाश, वाचिक अभिनय, शारीर अभिनय आणि मांडणीशिल्प यांच्या सहाय्याने जेंव्हा संस्कारित केला जातो तेंव्हा एकीकडे आपण वाचक म्हणून असलेल्या स्वातंत्र्याला पारखे होतो पण दुसरीकडे आपल्याला त्यापेक्षा कितीतरी जास्त मिळतं.



अभिवाचनाचा प्रयोग राहत्या वास्तूमध्ये केला गेला. यामागे लिखाणातल्या वास्तूविषयीच्या विचारांना अनुभवाने जोडण्याचे प्रयोजन दिसले. अभिवाचनात ठराविक ठिकाणी केलेला मांडणीशिल्पांचा वापरही परिणामकारक होता. नरेंद्र भिडेंचे संगीत-संयोजन देखिल सुरेख होते. हव्या त्या ठिकाणी, हवे तितकेच आणि संहितेच्या अंगच्या सौन्दर्याला खुलवणारे. 


सध्याच्या जीवनातील वेगामुळे, धकाधकी मुळे आणि कोलाहलामुळे खोलवरच्या आणि तरल अनुभूतींसाठी आणि विचारप्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या अवस्थेला आपण पारखे होत आहोत. या प्रयोगात मात्र श्रोत्यांना अलगदपणे त्या अवस्थेत नेण्याची किमया केली गेली. 
सौन्दर्यविचार समजावून घेण्याचा आनंद तसेच तो सुंदरपणे ग्रहण करण्याचा आनंद असा दुहेरी आनंद, किमया या पुस्तकाच्या थेट वाचनात असू शकतो. या दोन्ही आनंदांना नव्या मिती या प्रयोगात मिळतात. 

मला हा प्रयोग अनुभवताना निराळ्याच प्रकारचा आनंद झाला. दुर्मिळ आणि जपून ठेवावी अशी अनुभूती मिळाली.


Friday 15 December 2017

सिल्क रूटवरील उझबेकिस्तान: प्राचीन संस्कृतीसंगमाच्या सुगंधाने दरवळणारा प्रदेश

मध्य आशिया आणि तिथून जाणारा; प्राचीन इतिहास असणारा सिल्क रूट ह्याबद्दल वेळोवेळी ऐकलं होतं आणि त्याबद्दल कायमच एक प्रकारचं कुतूहल वाटत आलेलं होतं. आर्यांचा भारतीय उपखंडात प्रवेश करण्यापूर्वीचा स्थलांतराचा मार्ग, बौद्ध धर्माचा पूर्वेकडे झालेला प्रसार, नंतर शक, कुशाण, हून या टोळ्यांची आक्रमणे, सिल्क रूट मार्फत झालेला विविध संस्कृतींचा संपर्क तसेच मध्ययुगात तैमुर आणि नंतर बाबराची आक्रमणे या बाबत नेहमीच मध्य आशियाचा संदर्भ येत असे. बाबरची स्मृतिचित्रे या बाबरनाम्याच्या मराठीतल्या संक्षिप्त पुस्तकात बाबरने त्याच्या आवडत्या फरगाना प्रांताबद्द्ल आणि समरकंद बद्दल सांगितलेल्या आठवणींच्या अनुषंगानेही या भागाबद्दल कुतूहल वाटत असे. नेहमी एकत्र फिरायला जाणाऱ्या आमच्या गटाने जेंव्हा सिल्क रुटची सहल काढायची ठरवले तेंव्हा हे सगळे संदर्भ जागे झाले होते.

प्राचीन काळात पूर्व आणि पश्चिम जगाला जोडणारे आणि चीन, कोरिया, जपान पासून ते युरोप पर्यंत पसरलेल्या विविध व्यापारी रस्त्यांचे जाळे म्हणजे सिल्क रूट किंवा सिल्क रोड. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकापासून ते कॉन्स्टॅटिनोपॉलचा पाडाव होईपर्यंत म्हणजे सोळाव्या शतकापर्यंत या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात व्यापारी दळणवळण होत असे. हंगेरी ते मांचुरिया अशा पसरलेल्या स्टेप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गवताळ प्रदेशाला समांतर अशीच सिल्क रूटची मुख्य शाखा होती. या गवताळ प्रदेशात राहणाऱ्या भटक्या लोकांचे त्यांच्या दक्षिणेला असलेल्या स्थिर समाजाच्या लोकांशी एक परस्परावलंबी असे नाते होते. भटक्या लोकांनी साम्राज्ये रचली आणि स्थिर समाजाच्या लोकांना संरक्षण दिले. त्यांच्यात होणाऱ्या व्यापारास आवश्यक दळणवळण सुलभ होण्यासाठी रस्त्यांना संरक्षण दिले. बदल्यात त्यांना या स्थिर समाजांपासून वस्तू आणि द्रव्याचा पुरवठा होत राहिला. या परस्परपूरक प्रक्रियेची परिणिती जगातील सगळ्यात सामर्थ्यशाली साम्राज्ये मध्य आशियात निर्माण होण्यात आणि सिल्क रुटची भरभराट होण्यात झाली.


युरोप, टर्की, आफ्रिका, अरेबिया, इराण, पूर्व आशिया, मध्य आशिया, भारतीय उपखंड, चीन, मंगोलिया, कोरिया, जपान या सगळ्या भागांना व्यापारानिमित्ताने जोडताना राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक पातळीवर सुद्धा सिल्क रूटचे मोठे परिणाम झाले. व्यापारी, यात्रेकरू, धर्मप्रसारक, सैनिक या लोकांमार्फत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कल्पनांचा आणि विचारांचा प्रसार पूर्व आणि पश्चिम जगात या रस्त्यामार्फत होत राहिला. चीन मध्ये तयार होणारे रेशीम ही जरी या व्यापारातली महत्वाची वस्तू असली तरी इतरही अनेक वस्तूंचा आणि उत्पादनांचा व्यापार या रस्त्यांवरून होत असे. भारतातून चीनकडे बौद्ध धर्माचा प्रसार मुख्यतः सिल्क रूट वरून झाला. चिनी प्रवासी फाहियान आणि युवान श्वांग याच रस्त्यावरून भारतात आले होते.  
  
मध्य आशिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. कॅस्पियन समुद्रापासून ते चीन पर्यंत आणि अफगाणिस्तान पासून ते रशिया पर्यन्तचा भाग अशी सगळ्यात व्यापक व्याख्या झाली. पण मध्य आशियाचा गाभा म्हणायचा तर कझाकस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि किरगिझिस्तान हे पाच ‘स्तान’ होत. आमचा दौरा जास्तीत जास्त दोन आठवड्याचा असणार होता. एवढ्या काळात नीटच बघायचे झाल्यास दोन देशांना भेट देता येईल असा विचार होता. सिल्क रुटची सगळ्यात जास्त महत्वाची ठिकाणे उझबेकिस्तान मध्ये असल्याने उझबेकिस्तान हा एक देश अगदी सहजपणे ठरला. समरकंद, बुखारा, कोकंद, खिवा अशी एकापेक्षा एक भारी ठिकाणे या एका देशातच आहेत. तुर्कमेनिस्तानमध्ये मर्व्ह उर्फ मेरी हे ठिकाण आहे तर किरगिझिस्तान मध्ये बिष्केक आहे. पण निसर्ग सौंदर्य दृष्ट्या अधिक उजवा असल्याने दुसरा देश म्हणून आम्ही किर्गिझिस्तानची निवड केली.


हल्ली ट्रिप-ॲडवायजर, एअर बीएनबी यासारख्या वेबसाइट्समुळे परदेशप्रवासाचे नियोजन, आखणी, हॉटेल्सचं बुकिंग इत्यादि अगदीच सोपे झाले आहे. आपल्याला हवे तसे नियोजन करता येते, शिवाय खर्चही कमी येतो. पण उझबेकिस्तान आणि किरगिझिस्तानची माहीती गोळा करताना असे समजत गेले की येथे स्थानिक टूर ऑपरेटर शिवाय जाणे जिकीरीचे आहे. नंतर सहलीत फिरताना सुद्धा वेळोवेळी याचा प्रत्यय येत गेला. भाषेची अडचण, पर्यटनस्नेही सुविधा आणि संस्कृतीचा अभाव, जुन्या सोव्हिएट कालीन ब्युरोक्रॅटिक प्रोसिजर्स, इत्यादि कारणांमुळे आम्हीही तेथे स्थानिक शाखा असणारा एक टूर ऑपरेटर गाठला आणि आमच्या सहलीचे नियोजन केले. दहा दिवस उझबेकिस्तान आणि पाच दिवस किरगिझिस्तान असा एकूण पंधरा दिवसांचा दौरा ठरला.

दिल्ली ते ताश्कंद हा तसा जेमतेम सव्वातीन तासांचा प्रवास. आधी हिंदू-कुश आणि नंतर तिएन शान या बर्फाच्छादित पर्वत रांगा ओलांडल्या की येतेच ताश्कंद. पिवळ्या वर्तुळाच्या आत उडणार्‍या हिरव्या रंगाच्या हंसाचा सुंदर लोगो असलेल्या उझबेकिस्तान एअरवेजच्या विमानाने आम्ही निघालो. खिडकीतून हिंदू कुश पर्वतरांगांचे यथेच्छ दर्शन घेत आणि वाटेत लागणार्‍या ठिकाणांचा अंदाज लावता लावता आम्ही दुपारच्या वेळेत ताश्कंदला पोहोचलो. विमानाची आणि विमानातल्या सेवेची स्थिती यथातथाच होती. विमानतळावर उतरल्यानंतरचा अनुभवही फारसा बरा नव्हता. विमानतळ बहुदा सोव्हिएत काळात बांधलेले असावे. त्यामुळे एकूण बांधकामाचा दर्जा आपल्या इथे सी.पी.डब्ल्यू.डी. च्या सरकारी बांधकामाचा असतो तसा निकृष्ठ होता. इमिग्रेशन साठीच्या काउंटर्ससमोर लांबलचक रांगा होत्या. भाषेच्या अडचणीमुळे एकूण गोंधळाचे वातावरण होते. मला वाटलं; काही खरं नाही या देशात. एकूण सगळाच सुमार मामला असावा इथे. रांगामध्ये भारतीय लोकही दिसत होते. एक मोठा गटच भारतीय पर्यटकांचा दिसत होता. एकूनच नंतर फिरताना लक्षात येत गेले की भारतीय पर्यटकांचे इकडे येण्याचे प्रमाण आम्हाला वाटले होते तसे नगण्य नव्हते. अर्थात प्रवेश करताना देशाविषयी झालेले मत नंतर मात्र सुधारत गेले.

विमानतळावरून बाहेर पडलो तेंव्हा दुपारची वेळ होती. मे महिन्याचा तिसरा आठवडा असल्याने उन्हाचा बऱ्यापैकी तडाखा होता. या ठिकाणांचे तापमान जरी आपल्यापेक्षा पाचेक डिग्रीने कमी असले तरी उत्तरेकडे असल्याने इथे उन्हाचा मारा जास्त तीव्र असतो. आपल्या इथे स्टेशनच्या बाहेर पडल्यावर ज्याप्रमाणे रिक्षावाले घेराव घालतात तसा इथे करन्सी एक्स्चेंज करून देणाऱ्यांचा घोळका दिसत होता. आम्हाला घ्यायला आमच्या टूर ऑपरेटरने नेमलेला माणूस आलेला असल्याने आणि त्याने दिलेल्या सूचनेनुसार आम्ही या घोळक्याकडे दुर्लक्ष केले. नंतरही असे करन्सी एक्स्चेंजवाले लोक आम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत राहिले. उझबेकीस्तान ही अजूनही बऱ्यापैकी बंदिस्त अर्थव्यवस्था असल्याने इथे समांतर अर्थव्यवस्थेचे मोठेच प्राबल्य आहे. सोम हे उझाबेकीस्तानच्या अधिकृत चलनाचे नाव आहे. सोम या शब्दाचा तुर्की भाषेतला अर्थ आहे ‘शुद्ध’. अर्थातच आपण ज्या अर्थाने सोम हा शब्द वापरतो त्याच्याशी याचा काही संबंध नाही. आम्ही गेलो तेंव्हा अधिकृत दराप्रमाणे एका डॉलरला चार हजार सोम असा दर असताना काळ्या बाजारात मात्र साडेसात ते आठ हजार असा दर होता. आणि हे काळा बाजारवाले अगदी सर्रास आणि खुलेआमपणे चलनाची देवाणघेवाण करताना दिसत होते.

आमच्या उझबेकिस्तानच्या मुक्कामासाठी आमचा साथीदार कम मार्गदर्शक कम दुभाषा म्हणून अक्रम नावाचा एका तिशीतला उत्साही, हुशार आणि हसरा माणूस नेमलेला होता. अक्रम बरोबर बसमधून मुक्कामाच्या हॉटेलकडे जाताना ताश्कंदचे दर्शन होत होते. विमानतळावर आलेल्या अनुभवाच्या तुलनेत शहर फारच छान वाटत होते. रस्ते प्रशस्त, स्वच्छ आणि नीटनेटके दिसत होते. बांधकामे नियोजनबद्ध दिसत होती. आपल्याकडे आढळून येते तशी आर्किटेक्चरल अनार्की आणि त्यामुळे निर्माण होणारे व्हिजुअल पोल्युशन दिसत नव्हते. जाताना शहराचा सर्वात महत्वाचा असा मध्यवर्ती परिसर लागला जिथे थोड्याशा उंचवट्यावर असणाऱ्या चौकात तैमूरलंग चा अश्वारूढ पुतळा दिसला.



आपण जसे शिवाजी राजांना शिवाजी महाराज असे आदराने संबोधतो तसे हे लोक तैमूरलंग ला आमीर तिमूर असे संबोधतात असे अक्रमच्या बोलण्यातून समजले. तैमूरलंग या लोकांसाठी किती महत्वाचा राष्ट्रीय नायक आहे हे आम्हाला नंतरच्या प्रवासात समजत गेले. एकूण शहराचा तोंडवळा आधुनिक दिसत होता. रस्त्यावर दिसणाऱ्या लोकांचे पोशाख आणि राहणीदेखील आधुनिक दिसत होती. वाटेत एका नवपरिणीत जोडप्याचे फोटोशूट चाललेले दिसले. काळा सूट घातलेला नवरदेव आणि पांढरा वेडिंग गाऊन घातलेली नवरी असा तो ख्रिश्चन प्रकार वाटत होता. पण अक्रमकडून समजले की दीर्घकालीन रशियन प्रभावाचा परिणाम म्हणून मुस्लीम जोडपी देखील अशा प्रसंगी ख्रिश्चन प्रकारचे पोशाख घालताना दिसतात.

ताश्कंदला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही खिवा या आमच्या पहिल्या ठिकाणाकडे कूच करणार होतो. स्थानिक ठिकाणी करावयाचे छोटे खर्च सोममध्येच करावे लागणार असल्याने काही डॉलर्सचे रुपांतर आम्ही सोम मध्ये करून घेतले. सोबत घेतलेल्या काही लाख सोमची पुडकी सांभाळायचं काम जोखमीचं वाटत होतं. हा नोटांचा ऐवज पाकिटात मावणारा नसल्याने तो अक्षरशः सोबतच्या छोट्या पिशवीत घ्यावा लागला होता. बहुतांश ठिकाणी डॉलर्सचा पर्याय उपलब्ध असल्याने हे सोमाचे लेंढार फार बाळगावे लागत नाही हेही तसे बरे आहे नाहीतर हा एक मोठाच त्रास होऊन बसला असता.

दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही ताश्कंदमधली काही महत्वाची ठिकाणे बघायला निघालो. ताश्कंद हे जरी राजधानीचे शहर असले तरी या शहराला तसे सोव्हिएत राजवटीतच महत्व आले. अन्यथा ताश्कंदपेक्षामोठा इतिहास असलेले आणि इतर सर्वच बाबतीत समृद्ध असलेले शहर समरकंद हेच आहे. उझबेकिस्तान एक आधुनिक अर्थाने राष्ट्र (नेशन स्टेट) म्हणून तसे सोव्हिएत राजवटीतच जन्माला आले. आपल्या भारतीय उपखंडाची म्हणून जशी प्राचीन काळापासूनची सांस्कृतिक सलगता होती तशी सलगता पाचही देशांपासून बनलेल्या मध्य आशियाची होती असे म्हणता येऊ शकते. पूर्वीच्या काळी स्थानिक पातळीवर राजकीय एकके म्हणजे प्रांत असत. जसा की ख्वारेझ्म नावाचा प्रांत ज्याची राजधानी खिवा येथे असे. या प्रांताचा काही भाग सध्याच्या तुर्कमेनिस्तानमध्ये आहे तर बाकीचा उझबेकिस्तानात आहे. आत्ताच्या उझबेकिस्तानात मोडणारे आणखी दोन प्रांत म्हणजे प्राचीन सॉग्दिया आणि कोकंद.
यापैकी सॉग्दिया प्रांताला इसविसनपूर्व सहाव्या ते सातव्या शतकापासूनचा इतिहास आहे. अर्थात हल्ली सॉग्दिया या नावाने तो सगळा भाग ओळखला जात नाही आणि त्याचा काही भाग सध्याच्या ताजिकिस्तानात आणि किरगिजिस्तानात मोडतो. प्राचीन काळापासून समरकंद शहर सॉग्दियाची राजधानी राहिलेले आहे.


ताश्कंद शहराला सुद्धा तसा इसविसनपूर्व चौथ्या शतकापासुनचा इतिहास आहे. हे शहर प्राचीन सिल्क रूटवरचे महत्वाचे ठिकाण होते. ताश्कंद शहर पूर्वी चाच या नावाने ओळखले जात असे. मूळच्या चाच या शब्दाला नंतर कंद हा शब्द लागून चाचकंद – ताश्कंद असे नाव झाले. हा जो कंद नावाचा तुर्की शब्द आहे तो इकडे सतत आढळत राहतो. समरकंद, कोकंद मध्ये सुद्धा तो आहे. कंदचा अर्थ आहे शहर किंवा गाव. कंद हा शब्द सॉग्दियन या जुन्या इराणी भाषेची शाखा असलेल्या भाषेतून आला असे म्हणतात. या कंद चे आपल्या संस्कृत खंड शी साधर्म्य आढळते. चिनी प्रवासी युवान श्वांग सातव्या शतकात भारतात आला होता तेंव्हा त्याने ताश्कंद शहराला भेट दिली होती. आत्ताचे ताश्कंद मात्र आधुनिक काळात नावारूपाला आलेले असल्यामुळे येथील महत्वाच्या वास्तू आणि स्थळे आधुनिक काळातील आहेत.

स्वतंत्र उझबेकिस्तान देशाच्या निर्मितीनंतर ताश्कंद मधल्या मध्यवर्ती चौकात स्वातंत्र्य स्मारक उभारण्यात आले. या चौकात आधी लेनिनचा मोठा पुतळा होता आणि चौकाचे नाव लेनिन चौक असे होते. आता या विस्तीर्ण चौकात काही स्मारके उभी केलेली दिसतात. पैकी एका स्मारकात ठराविक अंतरावर उभे असलेले सोळा उंच संगमरवरी खांब आहेत. हे खांब माथ्याला एकमेकाला एका आडव्या पुलासारख्या चौकोनी तुळईने जोडलेले दिसतात.

मधल्या दोन खांबाना जोडणाऱ्या तुळईच्या वरती हवेत उडणाऱ्या तीन करकोचांचे सुंदर शिल्प आहे.येथे करकोचे हे शांततेचे प्रतीक आहेत असे मानले जाते. पाठीमागे काही अंतरावरती आणखी एक भव्य स्मारक आहे. एका उंच आणि मोठ्या चबुतऱ्यावर एक सोनेरी रंगाचा धातूचा मोठा पृथ्वीगोल दिसतो ज्यावर उझबेकिस्तान देशाचा नकाशा स्पष्टपणे दाखवण्यात आलेला आहे. चबुतऱ्याच्या खाली बाळाला मांडीवर घेतलेल्या एका मातेचे शिल्प आहे. हे मातृभूमीचे प्रतीक आहे असे मानले जाते. चौकातच महत्वाच्या सरकारी कार्यालयांच्या इमारती दिसतात. हा सगळा परिसर सुंदर बागांनी आणि कारंजांनी नटलेला आहे.

याच परिसरात दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या स्मृतीला वाहिलेले एक भव्य स्मारकही आहे. हे स्मारक म्हणजे एक मोठे उद्यानच आहे. यात मध्यभागी एका शोकमग्न वृद्ध बाईचा पुतळा आहे. डोक्यावर पदराप्रमाणे स्ट्रोल घातलेली एक माता खाली मान घालून शोकमग्न अवस्थेत बसलेली दिसते.
शोकाबरोबरच धीरोदात्तपणाचे भाव तिच्या चेहऱ्यात दिसून येतात. या पुतळ्यासमोर एक सतत पेटती ठेवली जाणारी मोठी ज्योत आहे. या पुतळ्याच्या दोन्ही बाजूला पटांगणामध्ये आयताकृती गॅलरीज आहेत. या गॅलरीजमध्ये दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्या जवळपास चार लाख सैनिकांची नावे  धातूच्या पानांवर कोरलेली आहेत. ही पाने पुस्तकाच्या पानांप्रमाणे एकत्र गोवली आहेत. आणि अशी अनेक पुस्तके गॅलरीजमध्ये ठिकठिकाणी लावलेली आहेत. दर्शकांना ही पाने सहज वाचता यावी अशी सोय आहे.



शहरात दुसऱ्या एका ठिकाणी आधी रशियन आणि नंतर सोव्हिएत राजवटीस विरोध करताना मारल्या गेलेल्या स्थानिक वीरांचे स्मारकही आढळले. एकंदरीतच उझबेकिस्तान देशाच्या निर्मितीनंतरच्या काळात राष्ट्रीय भावनेच्या नवनिर्मितीची मोठीच प्रक्रिया इस्लाम कारीमोव्ह यांच्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत झालेली दिसते. ह्या सगळ्या आधुनिक स्मारकांमध्ये ही प्रक्रिया दृगोच्चर झालेली दिसते.

ताश्कंदमधले भारतीयांना महत्वाचे ठिकाण म्हणजे लालबहादूर शास्त्रींचा पुतळा. शहरातील एका तिठ्याच्या ठिकाणी शास्त्रीजींचा अर्धपुतळा बसवलेला आहे.
पुतळ्याच्या पाठीमागे काही झाडे असलेली छोटीशी बाग आहे. शास्त्रीजींच्या स्मृती इथल्या जनमानसात काही प्रमाणात असाव्यात असे दिसले. त्यांच्या नावे शहरात एक सांस्कृतिक केंद्रही आहे आणि एक शाळाही.

खिवाला जाण्यापूर्वी आम्ही ताश्कंदमधल्या एका पॉप्युलर रेस्तरा मध्ये जेवायला गेलो होतो. सुटीचा दिवस नसताना आणि दुपारची वेळ असताना सुद्धा रेस्तरा मध्ये चांगलीच गर्दी होती. उतार वयातले लोक सोडता सगळेच पाश्चात्य पद्धतीच्या पोशाखात दिसत होते. एका टेबलावर पन्नाशीच्या पुढच्या वयातल्या पारंपारिक पोशाखातल्या बायका जेवायला बसलेल्या दिसत होत्या. या सगळ्याजणी मस्तपैकी हसतखेळत गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेत होत्या. नंतर इतरत्रही आम्हाला या वयातल्या बायकांचे असे बाहेर जेवायला जमलेले, फिरण्यासाठी आलेले गट दिसत राहिले.
अतिशय रंगीबेरंगी पायघोळ गाऊन आणि सलवार घातलेल्या या बायकांनी डोक्याला विशिष्ठ पद्धतीने स्कार्फ गुंडाळलेला असे. नंतर असेही समजले की आपल्या इथे जसे मंगळसूत्र हे विवाहित असल्याचे लक्षण समजले जाते तसे तिथे स्कार्फ बाबत होते. रेस्तरामध्ये मांसाहार करणाऱ्यांसाठी विविध प्रकारचे कबाब, नाना प्रकारच्या स्थानिक मांसाहारी पाककृती असे भरपूर पर्याय उपलब्ध होते. इथे बीफ सर्रास खाल्ले जाते आणि घोड्याचे मांस ही डेलिकसी समजली जाते. आपल्याकडे बकरीचे आणि मेंढीचे दोन्ही प्रकारचे मटन मिळते. इथे मात्र बकरीचे मटन मिळत नाही; केवळ मेंढीचेच मटन खाल्ले जाते. शाकाहारी लोकांसाठी तसे मर्यादितच पर्याय उपलब्ध असतात. विविध प्रकारची सलाड्स, फळे आणि सूप्सचा शाकाहारी मंडळींना आधार मिळू शकतो.

खिवाला विमानाने जाण्यासाठी जवळचे विमानतळ उर्गेंच येथे आहे. उर्गेंच हे अमु दर्या नदीच्या काठावर वसलेले आणि सोव्हिएत काळात उदयास आलेले शहर आहे. ताश्कंदच्या छोट्याशाच डोमेस्टिक विमानतळावरून आम्ही संध्याकाळी निघालो. आपल्या इथल्या घोळका गोंधळ पद्धतीने पाशिंजरं गेटवर जमा झाली आणि नंतर घोळका रांगेने विमानतळात शिरली. उर्गेंचचे विमानतळ आणखीच छोटे होते. ठिकठिकाणी भरपूर बिनकामाच्या तपासण्या करवून घेत आम्ही एकदाचे विमानतळाच्या बाहेर पडलो. बसमधून खिवाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. खिवाबद्द्ल बरेच ऐकलेले असल्यामुळे खूप उत्सुकता होती. इतरांकडून किती जरी माहिती घेतली आणि अगदी फोटो जरी बघितले तरी प्रत्यक्ष बघण्यातली मजा निराळीच असते.

खिवामध्ये पोहोचलो तेंव्हा अंधार पडायला लागला होता. आमचे हॉटेल ‘इचान काला’ नावाच्या तिथल्या; हजारेक वर्षाचा इतिहास असणाऱ्या; तटबंदीने वेढलेल्या शहराच्या दरवाजासमोरच होते. सकाळी लवकर उठून आम्ही काहीजण उत्सुकतेने ‘इचान काला’ मध्ये फेर फटका मारायला गेलो. तटबंदीची भिंत चांगलीच उंच आणि रुंद होती. मातीच्या मोठ्या आकाराच्या विटांपासून तयार केलेली भिंत वेळोवेळी खुबीने रिनोव्हेट केली गेलेली दिसली. आमच्या हॉटेलच्या बाजूच्या दरवाजासमोर उभे राहिल्यावर परीकथेतल्या ऐतिहासिक शहराच्या समोर असल्याचा भास होत होता. सकाळच्या निर्मनुष्य वेळी आतला भाग निवांतपणे बघायला मिळणार होता. याला शहर जरी म्हटले तरी तशी ही पूर्वीच्या काळातल्या खाशा लोकांच्या राहण्यासाठीची; मजबूत आणि बुलंद तटबंदीने वेढलेली मोठी जागा होती. हे लघुशहर सव्वीस हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आणि ६५० मीटर लांब, ४०० मीटर रुंद असलेल्या भिंतीने वेढलेले आहे.


भिंतीना चारही दिशांना चार भव्य दरवाजे आहेत. या दरवाजांना इथल्या स्थानिक तुर्की भाषेतही दरवाजा असेच म्हटले जाते. आपल्या आणि त्यांच्या भाषेत सामायिक असलेला हा शब्द दोन्ही भाषांमध्ये पर्शियन भाषेतून आलेला आहे. असे अनेक पर्शियन मूळ असलेले सामायिक शब्द इकडे एखाद्या परक्यांच्या लग्नसमारंभात पाहुणा भेटावा तसे भेटत राहतात. तटबंदीच्या आतमध्ये पन्नासेक ऐतिहासिक वास्तू आणि २५० सर्वसामान्य लोकांची राहती घरे आहेत. इकडे येण्यापूर्वी खिवाची माहीती घेण्यासाठी इन्टरनेट वर पाहताना कायम इचान कालाचे तटबंदीच्या आतून डोकावणाऱ्या मिनारांच्या आणि घुमटांच्या गर्दीचे विहंगम फोटो बघायला मिळाले होते. दिवसाच्या वेगवेगळ्या काळात इचान कालामधून फिरताना या लघुशहराचे विविध प्रकारचे सौंदर्य अनुभवायला मिळाले.

खिवाबद्द्ल जाणून घ्यायचे असेल तर खिवा ज्या प्रांताचे मध्यवर्ती ठिकाण होते त्या ख्वारेझ्म प्रांताबद्दलची माहीती घेणे आवश्यक आहे. कॉकेशस पर्वताच्या पायथ्याच्या भागात मूलस्थान असलेले इंडो इराणी भाषा बोलणारे लोक स्थलांतरे करत अरल समुद्राजवळुन खाली दक्षिणेत उतरले असे म्हणतात. खाली उतरल्यानंतरचा त्यांचा मार्ग हा बराचसा आत्ताच्या उझबेकिस्तानातून अमु दर्या नदीच्या काठाने जाणारा होता असे मानले जाते. ख्वारेझ्मचा ओसीस हा या मार्गावरचा महत्वाचा पडाव होता असे म्हणतात. अवेस्तामध्ये इराणी भाषकांच्या प्राचीन पूर्वजांची स्थलांतरे नोंदवलेली आहेत. पैकी अर्यानाम वेजो हे पहिले स्थान आहे. काही तज्ञांचे असे म्हणणे आहे की ख्वारेझ्म प्रांत म्हणजेच प्राचीन अर्यानाम वेजो आहे. असे जरी असले तरी खुद्द इचान काला मधली जुन्यात जुनी इमारत बाराशे वर्षांपूर्वीची आहे.

इचान कालाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ “मुहम्मद इब्न मुसो अल ख्वारेझ्मी” या खिवाच्या जगप्रसिद्ध सुपुत्राचा भव्य असा बैठा पुतळा आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्यावर नोंदवल्याप्रमाणे ख्वारेझ्मींचा काळ ७८३ ते ८५० असा होता. आधुनिक शास्त्रांच्या प्रगतीमध्ये अरबी तत्वज्ञ आणि विचारवंतांनी मोठे योगदान दिल्याचे आपण ऐकलेले असते. पण त्यांच्यापैकीचा एक महत्वाचा माणूस हा मुळातला अरबी नसून ख्वारेझ्मी होता हे मला इथे आल्यानंतर समजले. ख्वारेझ्मीची मातृभाषा इराणी होती आणि त्याने गणित, खगोलशास्त्र, बीजगणित, भूगोल, इत्यादि विषयांचे महत्वाचे संशोधन बगदाद मध्ये तिथल्या खलिफाच्या आश्रयाखाली केले होते. ख्वारेझ्मीला बीजगणित या विषयाचा जनक मानले जाते. त्याच्या बीजगणितविषयक महत्वाची प्रमेये मांडणाऱ्या पुस्तकाचे नाव “अल किताब अल मुख्तसर फि हिसाब अल जब्र अल मुकाबला” असे होते. या पुस्तकाच्या नावातल्या “अल जब्र” या शब्दांवरूनच बीजगणित विषयाला “अल्जेब्रा” असे नाव पडले. एकूण त्या काळात ख्वारेझ्म हे महत्वाचे असे शैक्षणिक केंद्र होते असे मानले जाते. दहाव्या शतकातला मोठा इतिहासकार “अल बिरूनी” हा देखील याच भागातला. त्याचे बिरूनी हे गाव उर्गेंचपासून काही अंतरावरच आहे. ख्वारेझ्मी विषयी जाणून घेताना नवव्या शतकात आत्ताच्या इराक पासून ते उझबेकिस्तानापर्यंतचा हा सगळा प्रदेश कसा जोडला गेलेला होता आणि पश्चिमेकडील प्राचीन ग्रीक तत्वज्ञानाचे पुनरुज्जीवन करणे तसेच पूर्वेकडील भारतीय तत्वज्ञानाचे पश्चिमेकडे वहन करण्याचे काम या भागातले अभ्यासक करत होते हे परत एकदा प्रकर्षाने लक्षात आले. सध्याच्या इस्लामी गोष्टींवर सरसकट पणे मागास असल्याचा शिक्का मारण्याच्या सध्याच्या काळात मध्य युगात या सगळ्या भागात असणाऱ्या बौद्धिक आणि सांस्कृतिक चैतन्याचा आठव महत्वाचा ठरू शकतो.

इचान कालाची माहीती देण्यासाठी एक ‘इनीस’ नावाची स्थानिक गाईड आमच्याबरोबर होती. ओघवते इंग्रजी बोलणाऱ्या या गाईड बाईचा इतिहासाचा चांगला अभ्यास होता. खिवा शहराला तसा पुरातत्त्वाच्या दृष्टीने सहाव्या शतकापासूनचा इतिहास असला तरी खिवाचीलेखी नोंददहाव्या शतकापासून होताना आढळते. इचान काला युनेस्कोतर्फे संरक्षित असल्याने एकंदरच हा सगळा परिसर छान विकसित केलेला आहे. स्वच्छता, देखभाल, ठिकठिकाणी माहिती देणारे फलक अशी चांगली सोय केलेली आहे. पर्यटनस्थळांबाबतची ही आस्था उझबेकिस्तानात इतरही जवळपास सगळ्याच ठिकाणी आढळून आली. इचान कालामध्ये संपूर्ण दिवस आम्ही मदरसे, मशिदी, राजांचे महाल, मिनार, इत्यादी वास्तू बघण्यात घालवला. ऐतिहासिक वस्तू असलेले पण तरीही लोकांची वस्ती आणि चहलपहल असलेले असे हे छोटे गावच म्हणायचे.

आमच्या फेरफटक्याची सुरुवात एका मदरशापासून झाली. ख्वारेझ्म प्रांतातल्या प्रदीर्घ ज्ञानपरंपरेचा भाग म्हणून खिवामध्ये सुद्धा बरेच मदरसे आढळतात. मदरसा म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर हातात धर्मग्रंथ घेऊन घोकंपट्टी करणारी मुले आणि कट्टरपंथी लोक येतात. पण इथे मदरसे त्यांचे जे मूळ स्वरूप आहे, विश्वविद्यालय या अर्थाचे, त्या स्वरुपात दीर्घ काळ अस्तित्वात होते असे दिसले. वेगवेगळे मदरसे वेगवेगळ्या विषयात खोलवरचा अभ्यास आणि संशोधन करणारे असत. प्रदीर्घ रशियन राजवटी नंतरच्या काळात त्यांचे पूर्वीचे ज्ञानवैभव लयाला गेले असणार; हे आपण अशीच दीर्घ काळ परकीय राजवट सहन करणाऱ्यांपैकी म्हणून नीट समजावून घेऊ शकतो. इथे मदरशाची रचना ठराविक पद्धतीची असते. इमारतीचा आकार आयताकृती असतो. आयताच्या तीन बाजूंना मुख्यतः विद्यार्थ्यांच्या रहायच्या एकमजली किंवा क्वचित दुमजली खोल्या बांधलेल्या असतात. चौथ्या दर्शनी बाजूचे बांधकाम दुमजली असते. प्रवेशद्वार भव्य आकाराचे मोठ्या कमानीने युक्त असते आणि दर्शनी बाजूच्या दोन्ही टोकाला गुलदस्ता नावाचे मिनार असतात. आतल्या पटांगणामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीची जागा असते.

इचान कालामधला सगळ्यात मोठा मदरसा मोहम्मद आमीन खान यांच्या नावाने ओळखला जातो. हा मदरसा खिवाचा राजा मोहम्मद आमीन खान याने १८४५ साली बांधला. सध्या या मदरशाचे रुपांतर हॉटेलमध्ये केलेले आढळले. इथे आम्हाला विद्यार्थ्यांची खोली, जिचे रुपांतर हॉटेलच्या खोलीत झाले होते, नीट बघायला मिळाली. खोली तशी छोटीशीच असली तरी प्रकाश आणि वायुविजनाची चांगली सोय होती. एकंदरच मदरसा फारच मोठा आणि भव्य होता. या मदरशाला लागूनच एक सुंदर अर्धवट बांधलेला मिनार दिसतो. याला इथे कलता मिनार असे म्हणतात. 




याची प्रस्तावित उंची ८० मी. इतकी होती. पण २९ मी. इतकी उंची झाल्यानंतर याचे बांधकाम थांबले. इचान काळातल्या लक्षात राहणाऱ्या वास्तुपैकी हा प्रचंड मोठा घेर असलेला पण तुलनेत कमी उंची असलेला हा मिनार आहे. 

इथल्या अनेक मशिदींपैकी जुमा मशीद नावाची मशीद उल्लेखनीय वाटली. ही दहाव्या शतकात बांधलेली आहे. इतर मशिदींच्या मानाने ही तशी साधीच पण विस्तीर्ण आहे. घुमट नाही की कमानी नाहीत. केवळ एकमजली इमारत. आतमध्ये एक मोठाच्या मोठा सामायिक प्रार्थनेसाठीचा मोठा हॉल आहे. हॉलचे छत चार ते पाच मी. उंचीच्या जवळपास दोनशे लाकडी खांबांच्या आधाराने उभे आहे. आपल्या इथल्या जुन्या वाड्यांना जसे छताला खण असतात तसेच खण इथे दिसत होते. दोनशे एक खांबांपैकी थोडेच खांब जुन्या काळापासूनचे आहेत. ह्या खांबांवरून हात फिरवताना चिंगिज आणि तैमुर या थोर लोकांनी पाहिलेल्या वस्तूवरून आपण हात फिरवत आहोत अशी अद्भुत प्रचीती येत होती. गैरमुस्लिम असणाऱ्या चिंगिज खानाने या मशिदीचा उपयोग घोडे बांधण्यासाठी केला होता म्हणे. नंतर सोव्हिएत रशियाच्या काळात तेंव्हाच्या नियमाप्रमाणे सामुहिक धार्मिक प्रार्थनांना बंदी असल्याने या मशिदीला कुलूपच होते.



इतर महत्वाच्या वास्तूपैकी एक म्हणजे इस्लाम खोजा कॉम्प्लेक्स. यात एक छोटा मदरसा आणि एक उंचच्या उंच मिनार आहे. १९०८ साली बांधलेला हा मिनार ५७ मी. उंच आहे. यास ४५ मी. वर एक निरीक्षण गॅलरी आहे. या गॅलरीपर्यंत अंधाऱ्या आणि अरुंद जिन्यातून चढून जाणे तसे जिकीरीचे होते. 




पण वर गेल्यानंतर संपूर्ण इचान कालाचे आणि खिवा शहराचे दिसणारे दृश्य मात्र मनोहर होते. इचान कालाची सगळीच तटबंदी, आतमधल्या मातकट रंगाच्या वेगवेगळ्या वास्तू, निळ्या आणि हिरव्या टाइल्सच्या तुकड्यांच्या नक्षीकामाने सजलेले उंच मिनार आणि गोलाकार घुमट बघताना डोळे निवले.




इथे कुन्या आर्क नावाचा जुन्या काळातल्या बालेकिल्ल्याचा परिसर आहे. या बालेकिल्ल्यात राजाचा महाल, महत्वाच्या लोकांची घरे, शस्त्रागार, भटारखाना, पागा, टाकसाळ, इत्यादी वास्तू होत्या. पैकी दिवाणखाना, जनानखाना (हरेम), मशीद आणि टाकसाळ या वास्तू सध्या शिल्लक आहेत. त्याही एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात दुरुस्त होत आलेल्या स्वरुपात आहेत. खिवाचे राजे या ठिकाणाहून बाराव्या शतकापासून राज्य करीत होते. पण या भागाचा आत्ता आहे तसा विस्तार सोळाव्या शतकापासून सुरु झाला. सध्या फक्त अलीकडच्या काळातले अवशेष शिल्लक आहेत. इथल्या दिवाणखान्यात आणि जनानखान्यात भिंतींवर फरशांचे तुकडे वापरून केलेली कलाकुसर सुंदर आहे.




अल्ला कुली खान या एकोणिसाव्या शतकातल्या राजाने मात्र इचान काळामध्ये एक नवाच महाल उभा केला. अलीकडच्या काळातला असल्याने हा महाल जास्त प्रेक्षणीय आणि सुंदर आहे. खासकरून विविध भिंतींवर दिसणारे टाइल्सचे काम आणि छताला असलेले लाकडावर केलेले रंगकाम. 



जवळपास एकशे साठ खोल्या आणि पाच मोठी प्रांगणे असलेल्या या महालातील काही दालने बघण्यासारखी आहेत. महालातल्या महत्वाच्या भागातल्या बऱ्याचशा भिंती निळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगांचे कलात्मक नक्षीकाम असलेल्या टाइल्सनी मढवलेल्या आहेत. 



छोट्या आकाराच्या अनेक टाइल्सनी एक पूर्ण भिंत भरली आहे आणि या सबंध भिंतीवरच्या सगळ्या टाइल्सची मिळून एकच मोठी नक्षी दिसते आहे असे अनेक ठिकाणी आढळले. 











अनेक ठिकाणी ज्यांना स्थानिक भाषेत आयवान म्हणतात तशा दर्शनी बाजू उघडी आणि बाकी तीन बाजूंना भिंती असलेली दालने दिसून आली. अशा दालनाच्या छताला उंचच्या उंच अशा सुंदर कोरीवकाम असलेल्या लाकडी खांबांनी आधार दिलेला दिसतो. 



अशा काही खांबांच्या पायाशी मोठा कोरीवकाम केलेला शिलाखंड दिसून येतो. अशा बऱ्याचशा शिलाखंडांवर मोठ्या आकारातली स्वस्तिक चिन्हाची नक्षी आढळली हा झोराष्ट्रीयन प्रभावाचा भाग मानला जातो. भिंतींवरच्या नक्षीकामामध्ये सुद्धा काही इतर झोराष्ट्रीयन  चिन्हे आढळतात. प्रशस्त अंगण, अनेक खोल्या आणि राजाच्या निवासाची जागा असलेला इथला जनानखाना सुद्धा बघण्यासारखा आहे. महालाच्या काही भागातल्या दालनांमध्ये स्थानिक वस्तूंच्या विक्रेत्यांना त्यांच्या वस्तू विकण्यासाठी जागा दिलेली दिसली. हा प्रकार अर्थात उझबेकिस्तानात इतरत्रही दिसला. यामुळे विक्रेत्यांची सोय झाली आणि परिसरही स्वच्छ राहिला असा दुहेरी उपयोग झालेला दिसला.

इचान कालामध्ये संपूर्ण दिवस फिरणे हा अविस्मरणीय अनुभव होता. देशोदेशीच्या पर्यटकांबरोबरच भरपूर संख्येने असणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी आतले प्राचीन काळाचे ठसे जागोजागी बाळगणारे रस्ते गजबजलेले असत. 



मधूनच आपण कुठल्या तरी प्राचीन काळात गेलो आहोत असा विचित्र भास होत असे. इचान कालाच्या आतच अनेक रेस्तराँ आणि हॉटेलेदेखील आहेत. दुपारचे आणि रात्रीचे जेवण आम्ही अशा आतल्याच रेस्तराँमध्ये केले. दिवसभरात पायी फिरत अनेक मदरसे, मशिदी, मकबरे, मिनार आणि महाल बघून पाय दुखायला लागले होते. नंतरच्या पुढच्या भटकंतीतही हे पाच “म” आमचे पाय दुखवणार होते.

येताना जरी आम्ही हवाईमार्गे आलो असलो तरी जाताना मात्र आम्ही खुश्कीच्या मार्गाने जाणार होतो. सुरुवातीचा टप्पा खिवा ते बुखारा हा होता. हा सगळा रस्ता वाळवंटातून जातो. 


(लाल वाळवंट. क्षितीजावर हिरवी रेषा दिसते ती आमु दर्याच्या पाण्यामुळे तयार झालेल्या हिरवाईची.)

इथे सर्वत्र आढळणाऱ्या लाल रंगाच्या वाळूमुळे या वाळवंटाला तुर्की भाषेत लाल वाळवंट असे म्हणतात. तसे पाहता काही सुपीक खोऱ्यांचा भाग वगळता उरलेला सगळा म्हणजे जवळपास ९० टक्के उझबेकिस्तान हा वाळवंटे आणि डोंगरांनी व्यापलेला आहे. आमचा सुरुवातीचा रस्ता अमु दर्याच्या काठाने जाणार असल्याने आम्ही खुष होतो. अमु दर्या ही अफगानिस्तानात हिंदुकुश पर्वतात उगम पावून दक्षिणोत्तर वाहत अरल समुद्राला जाऊन मिळणारी नदी उझबेकिस्तानच्या दृष्टीने महत्वाची आहे. जेमेतेम पाऊसमान असणाऱ्या हा कोरडा प्रदेश पूर्णतः अमु दर्या आणि सिर दर्या या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. अमु दर्या नदी तर ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा फार महत्वाची आहे. या नदीचं आंग्ल भाषेतील नाव ऑक्सस असे आहे जे मूळच्या वक्ष या नावावरून आलेले होते.




अजूनही अमु दर्याच्या एका उपनदीचे नाव वक्ष असे आहे. प्रवासात अमु दर्येचे विशाल पात्र ओलांडून जाताना भारतीय संस्कृतीस मोठ्या प्रमाणावर प्रभावित करणारे आर्यभाषा बोलणारे लोक कधी काळी या नदीकडेने भारतात आले असतील या विचारांनी अंगावर शहारे आले. नंतरही लाल वाळवंटात मध्येच दूरवर हा अथांग निळ्या पाण्याचा प्रवाह दिसत राहिला.

साडेचारशे किलोमीटर्सचा प्रवास करून संध्याकाळी आम्ही बुखारात पोहोचलो तेंव्हा शहराच्या क्षितीज रेषेवर दिसणाऱ्या घुमटांच्या आणि मिनारांच्या आकारांवरून हे लक्षात आले की आम्ही प्राचीन सिल्क रूट वरचे एक महत्वाचे जंक्शन असलेल्या शहरात आलो आहोत. बुखारा हे प्राचीन सिल्क रूटच्या हमरस्त्यावर तर होतेच शिवाय इथून उत्तरेकडे खिवामार्गे एक फाटा गेला होता तर दुसरा खाली दक्षिणेकडे तर्मेझ, काबुल, पेशावर, लाहोर मार्गे सध्याच्या भारतात गेला होता. व्यापाऱ्यांची गजबज असल्यामुळे बुखारात अनेक कारवासराय म्हणजेच व्यापाऱ्यांच्या काफिल्यांच्या मुक्कामासाठीच्या मोठ्या वास्तू दिसल्या. पैकी एक सराय आम्ही नीट फिरून बघितला. या सरायचे नाव होते ताकी टेल्पाक फुरुशान. 




नावावरून असे कळत होते की मोठा विस्तार असलेली आणि डझनावारी छोटे घुमट मिरवणारी ही इमारत केवळ टोप्या विकणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी योजिलेली होती. आत्ता सुद्धा ही जागा फेरीवाल्या विक्रेत्यांना दिलेली असल्याने तिथे फिरताना तो जुना व्यापारी माहौल जागा झालेला दिसला. इथेच आम्ही एका हमामात अंघोळ करण्यासाठी गेलो होतो. 




जवळपास चारशे वर्ष जुना असा हा हमाम अजूनही वापरात आहे आणि व्यापारी तत्वावर चालवला जातो. विविध उटणी लावून अंघोळ घालण्यापूर्वी तिथल्या बलदंड मसाजकर्त्यांनी दणकट पद्धतीने मसाज करून आमच्यापैकी काही जणांची बोबडी वळवली.

बुखारामधल्या सगळ्याच वास्तू नीट बघायच्या झाल्यास तीन चार दिवस लागु शकतात. एकच दिवस हाताशी असल्याने आम्ही त्यातल्या त्यात महत्वाच्या अशा वास्तू बघितल्या. इस्माईल सामानीचा मकबरा ही बुखारामधली सगळ्यात जुनी वास्तू आहे. नवव्या शतकात मध्य आशियावर राज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध सामानिद घराण्यातल्या एका महत्वाच्या राजाचा हा मकबरा आहे. घराण्यातले लोक सुन्नी मुस्लीम जरी असले तरी मूळचे इराणी होते आणि इस्लाम तसा मध्य आशियात नवा असल्याने या मकबऱ्याच्या वास्तुकलेवर झोरास्त्रीयन प्रभाव ठळक जाणवणारा आहे. तंतोतंत चौरस आकाराचा हा मकबरा मध्य आशियाई वास्तुकलेचा खास नमुना आहे. 




याच्या भिंतीवरील विटांपासून केलेले गुंतागुतीचे नक्षीकाम मनोहर आहे. 




यात बऱ्याच झोरास्त्रीयन चिन्हांचा आणि घाटांचा वापर केलेला दिसतो. बुखारातले सर्वात देखणे आणि भव्य ठिकाण म्हणजे कल्याण मिनार आणि आजूबाजूचा परिसर. 






कल्याण हा शब्द आपल्या परिचयाचा जरी असला तरी इथे तो भव्य अशा अर्थाने वापरलेला आहे. आपल्या शब्दाशी याचा काही संबंध आहे की नाही हे मात्र शोधूनही सापडले नाही. बुखाराच्या क्षितिजरेषेवर ४८ मीटर उंचीच्या या भव्य आणि नेत्रदीपक मिनाराचे राज्य आहे असे म्हणता येऊ शकते. 




११२७ साली बांधलेला हा मिनार चिंगीझ खानच्या हल्ल्यातून बचावला. या मिनाराच्या भिंतीवरील विटकामही सुंदर आहे. मिनाराला लागून असलेली कल्याण मशीद मात्र चिंगीझ खानाच्या हल्ल्यात उध्वस्त झाली होती. सध्याचे बांधकाम सोळाव्या शतकात पूर्ण झालेलं आहे. मशिदीचा परिसर फार म्हणजे फारच मोठा आहे. यात जवळपास १५००० लोक एकावेळी नमाज पढू शकतात. आयताकृती आकाराच्या मशिदीचा मधला पटांगणाचा भाग खुला आहे पण चारही बाजूंना मात्र २८८ छोट्या आकाराच्या घुमटांनी आच्छादलेल्या गॅलरीज आहेत.

नक्षबंदी या प्रसिद्ध सुफी पंथाचा चौदाव्या शतकातला संस्थापक बहाउद्दीन नक्षबंद हा मूळचा बुखाराचा होता. 



त्याचे थडगे, समाधीस्थळ आणि इतर काही वास्तूंचा भव्य समूह बुखारा शहराच्या वेशीवर आहे. शांततेचा प्रत्यय देणारा हा वास्तूसमूह बघून आम्ही बुखाराच्या शेवटच्या तीन पिढ्यातल्या राजांनी बांधलेला समर पॅलेस बघायला गेलो. याचे नाव सितोरा इ मोसी खोसा असे काव्यात्मक आहे. 



चंद्रासम ताऱ्याचा महाल असे त्याचे मराठीत भाषांतर होईल. सिताराबानू या आवडत्या राणीच्या स्मृतीप्रित्यर्थ हे नाव ठेवलेले होते. 

सुरुवातीला बांधलेल्या महालाचे अवशेष नाहीत पण नंतरच्या दोन राजांनी बांधलेल्या वास्तू बघायला मिळतात. शेवटची वस्तू १९१७ साली बांधून पूर्ण झाली. नंतरच्या वास्तूंमध्ये मध्य आशियाई आणि रशियन / युरोपियन वास्तूशैलीचा सुंदर मिलाफ बघायला मिळतो. महालांच्या विविध दालनांमध्ये काचकाम, टाइल्सची नक्षी, चित्रे, इत्यादी कलाकुसर सुंदर आहे पण हे सगळं मांडलिक बनलेल्या ऐतखाऊ राजांनी बनवलेलं आहे या विचारांनी अधून मधून व्यत्यय होत राहिला.



शहराच्या आतमध्ये असलेला ‘चष्मा अयुब’ नावाचा मकबरा आम्ही त्यानंतर बघितला. शंकाकृती घुमट असलेली ही तशी छोटेखानी वास्तू आहे. 



औषधी आणि दिव्य गुण असणारा झरा या ठिकाणी होता असे मानले जाते. हा झरा ज्या प्राचीन काळातल्या संताच्या कृपेने अवतरला त्याची कबर इथे आहे. पण इथली खरी बघण्यासारखी गोष्ट म्हणजे या वास्तूत असलेले बुखारातले तलाव, पाणीव्यवस्था या विषयावरचे सुंदर कायमस्वरूपी प्रदर्शन.









या वाळवंटी प्रदेशात जुन्या लोकांनी कशा जलसंवर्धनाच्या विविध पद्धती खुबीने विकसित केल्या होत्या याचे दर्शन इथे झाले. इथे बुखारात एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस असणाऱ्या एकशे चौदा तलावांचा नाव आणि ठिकाणासहितचा नकाशा आहे. जुन्या काळातल्या पाणी वाहून नेण्यासाठीच्या वस्तूंचे नमुने सुद्धा इथे ठेवले आहेत. 

इथली अरल समुद्राच्या कोरडे पडत जाण्याबद्द्लची माहिती मनाला स्पर्श करणारी आहे. पूर्वीच्या पाणीवापराच्या परिसरस्नेही आणि मर्यादशील पद्धती जाऊन सोव्हिएत काळात कापसाचे विक्रमी पीक घेण्यासाठी आणि महाकाय यांत्रिक शेती करण्यासाठी अमु दर्या आणि सिर दर्या या अरल समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा अनिर्बंध उपसा झाला. याचा परिणाम म्हणून गेल्या पन्नासेक वर्षात अरल समुद्राचा  १० टक्के इतकाच भाग जिवंत राहिलाय. आधुनिक सिंचनाच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचे अरल समुद्र हे एक विद्रूप प्रतिक बनले आहे.



यानंतर आम्ही प्राचीन काळापासून बुखाराच्या राजांचा वावर असलेला शहरात एका छोट्याश्या उंचवट्यावर वसलेला बालेकिल्ला बघितला. तसा या बालेकिल्ल्याच्या ठिकाणाचा पुरातत्त्वीय इतिहास इ.स.पूर्व काळापासूनचा आहे. पण सध्याचे बांधकाम वेळोवेळी दुरुस्त होत आलेले आणि नवे आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी इचान कालाच्या तटबंदीसारखीच आहे. आतला परिसर मात्र जेमतेम दहा एकर इतका आणि उंचावर आहे. आतमध्ये राज्यारोहणासाठी वापरायचा दरबार आणि प्रांगण आहे जे सोळाव्या शतकात बांधलेले आहे. अशीच इतरही काही दलाने आणि प्रांगणे आहेत. इथे एक बुखाराबद्दल ऐतिहासिक माहिती देणारे छोटेखानी म्युझियमही आहे. इथल्या उंचावरच्या ठिकाणावरून शहराचे विहंगम दृश्य दिसते. दिवसभराच्या दमणुकीनंतर आम्ही रात्री बुखाराच्या खास मांसाहारी पक्वान्नांवर ताव मारला. यात वाघुरी नावाचा मेंढीच्या मांसपासून बनवलेला पदार्थ खास रुचकर होता. इथे सर्वत्र खूप छान कबाब मिळतात. या कबाबांना ‘शाशलिक’ या रशियन नावानेही येथे ओळखले जाते. याशिवाय पिलाव (पुलावाचा भाऊ) आणि सोम्से (समोस्याचा भाऊ) हे देखिल ओळखीचे पदार्थ येथे सर्वत्र दिसतात. इथले खाद्यपदार्थ आपल्याइतके मसालेदार जरी नसले तरी अगदी युरोपीय पद्धतीचे सप्पकसुद्धा नसतात. भाताची उपस्थिती अनेक पदार्थांमध्ये दिसते तसेच नूडल्ससुद्धा सूपपासून आमट्यांपर्यंत अनेक पाककृतीत सढळपणे असतात. आपल्या इथल्या पोळ्या/चपात्या/रोट्या यांच्या पेक्षा आकाराने जवळपास दुप्पट आणि जाडीने दुप्पट ते तिप्पट असणारे गोल आकाराचे नान इथे सर्रास असतात. आपल्यासारखेच ह्यांचे नान सुद्धा तंदूरमध्ये बनवलेले असतात.

बुखाराहून निघताना समजले की खिवामध्ये जसा अल ख्वारेझ्मी हा गणिती, शास्त्रज्ञ आणि विचारवंत होता तसाच इथे बुखारात अकराव्या शतकात जन्मलेला इब्न सिना नावाचा मोठा शास्त्रज्ञ, विचारवंत होऊन गेला. याच्या नावाचा आंग्ल उच्चार अविसेना असा होत असे आणि याला आधुनिक वैद्यक शास्त्राचा जनक समजले जाते. पण याच्या काही स्मारकाची वगैरे आम्हाला माहिती मिळू शकली नाही. मध्य युगातल्या इथल्या सर्वच क्षेत्रातील वैभवाचे नवल करत आणि पहायच्या हुकलेल्या अनेक गोष्टींबद्दल हुरहूर बाळगत आम्ही बुखारा सोडले. बुखाराहुन समरकंदला जाताना आम्ही मुद्दाम वाट थोडी वाकडी करून शाखरीसब्ज मार्गे जाणार होतो. 


शाखरीसब्ज मधल्या ‘ख’ चा उच्चार वरती खिवामध्ये ‘ह’ असा केला जातो. तेथे खिवाचासुद्धा उच्चार हिवा असा केला जातो. इकडे बुखारात आणि दक्षिणेकडे मात्र हा ‘ख’ आपल्या उर्दूत उच्चारतात त्याप्रमाणे खाकरल्या सारखा उच्चारला जातो. शाखरीसब्ज हे तैमुरलंगचे जन्मस्थळ आहे. विस्तीर्ण उद्याने, उत्कृष्ठ रस्ते, चांगल्या प्रकारची निगा राखलेल्या अवस्थेतल्या पुरातन वास्तू, पर्यटकांच्या सोयीसाठी बॅटरी ऑपरेटेड बसेस, या सगळ्या गोष्टी उल्लेखनीय होत्या. इथल्या मध्यभागी असलेल्या मोठ्या उद्यानात तैमुरचा भव्य आणि देखणा असा पुतळा आहे. 



उझबेक लोकांसाठी तैमुर राष्ट्रीय नायक आहे. आधी सोव्हिएट राजवटीत तैमुरला फारसे महत्व नव्हते. पण स्वतंत्र राष्ट्र झाल्यानंतर उझबेकिस्तान राष्ट्रवादासाठी तैमुर हा महत्वाचा प्रेरणास्त्रोत आहे. शाखरीसब्जला तैमुरने बांधलेला प्रचंड मोठा राजवाडा आहे


(प्रवेशद्वाराचे भग्न अवशेष. मागे तैमुरचा पाठमोरा पुतळा दिसतो आहे. पायथ्याशी उभ्या माणसांवरून भव्यतेचा अंदाज येतो.)

तैमुरने ख्वारेझ्म प्रांतातले कारागीर आणून हा राजवाडा बांधला होता. सध्या या राजवाड्याच्या उत्तुंग अशा प्रवेशद्वाराचे भग्न अवशेषच केवळ शिल्लक हेत पण ते भव्यतेची साक्ष द्यायला पुरेसे आहेत. आत्ताच्या अवशेषांवरून असा अंदाज लावतात की राजवाड्याच्या प्रवेशद्वाराची मूळ उंची सत्तर मीटर असावी. या प्रवेशद्वारावर तैमुरने “तुम्हाला आमच्या सत्तेला आव्हान द्यायचे असेल तर तुम्ही आमच्या या वस्तू पहा” असे मोठ्या अक्षरात लिहून ठेवलेले आहे. तैमुर हा एक स्वयंसिद्ध माणूस होता. स्वतःच्या शौर्याच्या आणि युक्तीच्या बळावर त्याने मध्य आशियातले चिंगीझखानानंतरचे सर्वात मोठे साम्राज्य उभे केले. तैमुरच्या या वास्तू जतन करून हा सगळाच भाग या लोकांनी फार सुंदर आणि भव्य पद्धतीने विकसित केलाय.

आपला बाबर हा मूळचा उझबेकी असल्याने आपल्याला इथे उझबेकिस्तानात बाबर कुणी भारी असेल असे वाटते पण इथं बाबरचं काही विशेष कौतुक नाही. मोघल साम्राज्यापेक्षा मोठी असणारी  इथं अनेक साम्राज्यं होऊन गेली. त्यामुळे मोघल साम्राज्याविषयीही वेगळा काही भाव दिसत नाही. शिवाय यांच्यासाठी तो बाहेर गेलेला माणूस होता. तैमुर हा काही चिंगीझ खानाचा थेट वंशज वगैरे नव्हता. त्याचा कालखंड १३३६ ते १४०५ असा होता. तो तुर्कोमंगोल वंशावळ असलेला आणि आपल्या शिवाजीप्रमाणे स्वबळावर सम्राट झालेला एक थोर राज्यकर्ता होता. खान हा मूळचा मंगोलियन शब्द आहे ज्याचा अर्थ राजा असा होतो. ११६२ ते १२२७ असा कालखंड असणारा चिंगीझ खान हा भटक्या लोकांचा अॅनिमिस्टिक प्रकारातला धर्म पाळणारा मंगोलियन टोळीप्रमुख होता. त्याच्या साम्राज्यात हलाल आणि सुंता या तेंव्हा नव्या असणाऱ्या इस्लामिक प्रथांना बंदी होती. त्याच्या साम्राज्याची राजधानी देखील मंगोलियात होती. तैमुर मात्र मुस्लिम होता. आपल्या मुस्लिम असण्याचा फायदा त्याने मुस्लिमांचा पाठींबा मिळवण्यासाठी घेतला. मंगोलवंशीय असण्याचा उपयोग त्याने मंगोलियन मंडळींचा पाठींबा मिळवण्यासाठी केला. त्याची सगळ्यात प्रिय बायको, बिबी खानम ही मंगोलियन होती. किंबहुना शुद्ध राजवंशी असल्याचे सिद्ध करण्यासाठी मंगोलियन धागा जोडण्याची प्रथा नंतरही काही शतके या भागात होती.

सिल्क रूटवरचे सगळ्यात जास्त सांस्कृतिक घुसळणीचे ठिकाण असलेले समरकंद शहर बघण्याची आम्हा सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती. इतर शहरांप्रमाणेच समरकंदही प्रशस्त आणि नीटस रस्ते असलेले आणि सुंदर शहर होते. महत्त्वाचे पर्यटन स्थळ असूनही खूप गर्दी आणि गोंधळ नव्हता. मर्यादित वेळ हाताशी असल्याने आम्ही त्यातल्या त्यात महत्वाची ठिकाणे बघायचं ठरवलं होतं. 

सकाळीच आम्ही आधी मिर्झा उलुगबेगची वेधशाळा बघायला गेलो.








(उत्खननात सापडलेला जमिनीखाली असणारा वेधशाळेचा आर्क. वरील उजव्या बाजूचा फोटो वेधशाळेच्या मॉडेलचा आहे. वेधशाळा परिसरात एक सुंदर कायमस्वरूपी प्रदर्शन आहे. तिथे हे मॉडेल ठेवलेले आहे. खालील बाजूस वेधशाळेचा उभा छेद दाखवणारे मॉडेल आहे. यातला काही भाग जमिनीखाली आहे, जो उत्खननात सापडला आणि सध्या बघायला मिळतो)   

मिर्झा उलुगबेग हा तैमुरचा नातू. उलुगबेगने तैमुरच्या राज्याचा सांभाळ आणि विस्तार केला. शिवाय बऱ्याच मोठ्या वास्तू उभ्या केल्या. तो एक कार्यक्षम आणि दक्ष राजा होता ही एवढी ओळख अजिबातच अपुरी आहे. त्याची खास ओळख आहे ती एक गणिती, काव्यरसिक आणि अॅस्ट्रॉनॉमर म्हणून. त्याच्या काळात समरकंदची एक सांस्कृतिक आणि वैचारिक केंद्र म्हणून भरभराट झाली. त्याने शहराच्या परीघावर असलेल्या एका टेकडीवर एका भव्य वेधशाळेची निर्मिती केली. ही त्या काळातली इस्लामी जगतातली सगळ्यात मोठी वेधशाळा होती. दुर्बिण उपलब्ध नसल्याने अचूकता साधण्यासाठी त्याने पन्नासेक मीटर उंचीची ही वेधशाळा उभारली होती. उलुगबेगच्या मृत्यूपश्चात १४४९ मध्येच काही माथेफिरू लोकांनी ही वेधशाळा उध्वस्त केली होती. नंतर १९०८ मध्ये एका रशियन पुरातत्त्वशास्त्रज्ञाने उत्खनन करून या वेधशाळेचे काही महत्वाचे अवशेष जगासमोर आणले. उलुगबेगचे प्रसिद्ध उद्गार वेधशाळेच्या स्मारकावरील संगमरवरी दगडावर कोरलेले आहेत. तो म्हणतो, “धर्म धुक्याप्रमाणे विखुरला जातो, साम्राज्ये नष्ट होतात, पण विद्वानांच्या कृती अनंतकाळ टिकून राहतात.”

त्यानंतर आम्ही शाह-इ-जिंदा नावाचा मकबऱ्यांचा समूह बघितला. नवव्या ते चौदाव्या आणि एकोणिसाव्या शतकात बांधलेल्या अनेक महत्त्वाच्या लोकांचे मकबरे इथे आहेत. प्रेषित महंमदांचे चुलत भाऊ जे इथे अरब स्वारीच्या वेळी आले होते त्यांचा शिरच्छेद इथे झाला होता आणि त्यांचे दफनही इथे झाले अशी समजूत आहे. जिवंत राजा अशा अर्थानेच त्यांना उद्देशून शाह-इ-जिंदा असे या वास्तुसमुहाचे नाव आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षीकाम असलेल्या टाइल्सने सजलेल्या आणि वेगवेगळ्या काळात बांधल्या गेलेल्या इथल्या वास्तू बघण्यासारख्या आहेत. धार्मिकदृष्ट्‍या महत्त्वाचे ठिकाण असल्याने स्थानिक लोकही इथे मोठ्या प्रमाणात आलेले दिसत होते. 

इथून आम्ही गुर-इ-अमीर हा तैमुरचा मकबरा बघायला गेलो. 
मोठ्या आकाराचा आणि निळ्या रंगाचा भारदस्त घुमट मिरवणारा हा मकबरा विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत वाईट अवस्थेत होता. नंतर त्याची डागडुजी आणि पुनर्बांधणी झाली. याचे बांधकाम तैमुरच्या नातवंडांनी केले. मूळ बांधकामांपैकी दोन मिनार आणि प्रवेशद्वार एवढेच आत्ता आहे, बाकीचा भाग नंतरचा आहे. मकबऱ्याचा आतला भाग सुद्धा मनावर छाप उमटवणारा आहे.

घुमटाची आतली बाजू पूर्णपणे सोनेरी रंगाच्या चित्तवेधक कलाकुसरीने नटलेली आहे. 



खाली मध्यभागी तैमूरलंग, त्याचा कुणी एक गुरु, मुलगा शाहरुख आणि दोन नातू यांच्या कबरी आहेत. पैकी तैमुरची कबर मधोमध आणि वेगळ्या रंगाच्या दगडाची आहे. 



सोव्हिएत काळात तज्ञ मंडळीनी या कबरीतुन तैमुरचे अवशेष बाहेर काढून तपासणी केली होती. त्यांनी कवटीच्या हाडांवरून तैमुरचा चेहऱ्याचा अंदाज लावला. या चेहऱ्याची बनावट मंगोलियन होती.

गुर-इ-अमीर बघून झाल्यानंतर आम्हाला रेगिस्तानचा वास्तुसमुह बघायची उत्सुकता होती. येण्यापूर्वी फोटो बघितलेले असले तरी पहिल्याच दर्शनात या वास्तुसमुहाची भव्यता बघून आम्ही थक्क झालो. 


ताजमहाल बघताना जशा नवलाईच्या, सौंदर्यानुभवाच्या, आणि आनंदाच्या भावना एकत्रितपणे दाटून येतात तसे इथे होते. एका अतिशय विस्तीर्ण परिसरात एकमेकाशी काटकोनात असलेल्या या मदरशाच्या तीन अतिभव्य अशा वास्तू आहेत. या परिसरात शिरण्यासाठीचे प्रवेशद्वार दूरवर आणि थोडे उंचावर आहे. इथून संपूर्ण वास्तुसमुहाचा एकाच फ्रेममध्ये फोटो घेता येऊ शकतो. या फोटोमध्ये तिथे त्या वास्तूंच्या जवळ उभी असलेली माणसे त्या भव्य वास्तुंसमोर अक्षरशः खेळातल्या इवल्या बाहुल्यांसारखी वाटत होती. प्रत्येक मदरशाच्या आतला भागही खूपच विस्तीर्ण होता. मदरशाच्या आयताकृती इमारतीच्या चारही बाजूंना दोन मजल्यांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना राहण्यासाठीची प्रशस्त दालने होती. दुपारच्या उन्हात तीनही मदरशे फिरून बघता बघता आम्हाला दमायला झालं. तीनपैकी एक उलुगबेग मदरसा स्वतः उलुगबेगने पंधराव्या शतकात बांधलेला आहे तर इतर दोन सतराव्या शतकात बांधलेले आहेत. 


                          (शेर दोर मदरसा, रेगीस्तान समूह)


(शेर दोर मदरशाच्या कमानीवरील चित्रकाम. सिंह आणि सूर्य यांची चित्रे दिसतात. मुस्लीम वास्तूंवर न आढळणारी अशी ही वैशिष्ट्यपूर्ण चित्रे आहेत.) 

इथल्या मिनार, घुमट आणि कमानींच्या पृष्ठभागावरील निळ्या आणि हिरव्या रंगाच्या विविध छटांच्या टाईल्स वापरून केलेली खास इस्लामी प्रकारातली कॅलिग्राफी आणि नाना प्रकारच्या भूमितीय आकृत्यांचे नक्षीकाम मनमोहक आहे.  

समरकंदमधली आणखी एक भव्य वास्तू म्हणजे बीबी खानमची मशीद. बीबी खानम ही तैमुरची लाडकी असलेली मंगोलियन बायको होती. तैमुरच्या भारतावरील स्वारीनंतर १४०४ साली या मशिदीचे बांधकाम पूर्ण झाले होते. नंतरच्या काळात वस्तूची पडझड होऊन विसाव्या शतकातच या वास्तूचे पुनरुज्जीवन केले गेले. राणीसाठी बांधलेली ही वास्तू समरकंदमधली तेंव्हाची सर्वात भव्य वास्तू होती. एकेकाळी संपूर्ण इस्लामी जगात ही सगळ्यात मोठी मशीद होती. 

दर्शनी बाजूची कमान आणि बाजूच्या पन्नासेक मीटर उंचीच्या खांबावरून सुद्धा या मशिदीच्या भव्यतेचा अंदाज येतो. पण मूळचा घुमट नंतर पडल्याने आणि पुनर्बांधकामामुळे वस्तूची भव्यता आणि सौंदर्य कमी झाले. 
      
पर्शियन स्थापत्यशैलीचा देखणा अविष्कार समरकंदमध्ये बघायला मिळतो. या स्थापत्यशैलीचा गाढा प्रभाव मोघल स्थापत्यशैलीवर होता. इथल्या भव्य आणि सुंदर वास्तू पाहताना वारंवार हा प्रत्यय येत होता की समरकंद हे मध्य आशियातले ऐतिहासिक दृष्ट्या सर्वात महत्वाचे शहर आहे. अवेस्ता काळात हे सॉग्दिया नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राचे केंद्र होते.  त्यानंतरच्या विविध काळात समरकंद हे कायमच महत्वाचे शहर राहिलेले आहे. पर्शियन, झोरास्त्रीयन, मंगोलियन, तुर्की, अरबी, रशियन अशा विविध संस्कृतीची सरमिसळ इथे होत आलेली आहे. मात्र यातल्या बऱ्याच गोष्टी नंतर लुप्त पावत गेलेल्या आहेत. आपण भारतीयांनी जशी जुनी समृद्ध अडगळ सांभाळून ठेवली तसं इथं झालेलं दिसत नाही. पर्शियन प्रभाव भाषेत भरपूर प्रमाणात टिकून आहे. त्यामुळे आपल्याला परिचित असलेले शब्द सतत भेटत राहतात. झोरास्त्रीयन प्रभाव स्वल्प प्रमाणात कुठे कुठे आढळत राहतो. उदाहरणार्थ रेगीस्तान मधल्या एका मदरशावर दोन मोठी सूर्याची चिन्हे आहेत. काहीशे वर्ष पूर्ण प्रभाव असणारा झोराष्ट्रीयन धर्म इथून लुप्त झाला. युवान श्वांग सातव्या शतकात समरकंद मार्गे आला तेंव्हा त्याने या परिसरात वापरात नसलेल्या उजाड बौद्ध मंदिरांचा उल्लेख केलेला दिसतो. हे नंतर कालौघात लुप्त झाले असावेत.

समरकंदमधली आणखी एक आठवण हृद्य आहे. आम्ही एका रेस्तराँमध्ये रात्रीच्या जेवणासाठी गेलो असताना आम्हाला असे लक्षात आले की आतल्या एका हॉलमध्ये गाण्यांचा आवाज ऐकू येतोय. कुतूहलाने बघायला गेल्यानंतर असे लक्षात आले की तिथे एक म्युझिक जॉकी वेगवेगळी गाणी लावतोय आणि बायकांचा एक ग्रुप त्यावर मोकळेपणी छान नाच करतोय. इथल्या बऱ्याच रेस्तराँमध्ये आम्हाला अशी गाणे बजावण्याची सुविधा दिसली होती. इथे लोक नाचताना पण दिसत होते. आम्ही थोड्याशा दुरून कुतूहलाने बघताना पाहून त्या बायकांनी आम्हा लोकांना आग्रहाने नाचायला बोलावले आणि आमच्याबरोबर मस्त नाच केला. जॉकीनेही मग काही खास हिंदी सिनेमातली गाणी लावली. इतर कुटुंबिय सोबत असताना त्या बायका आमच्याबरोबर अगदी मोकळेपणाने नाच करत होत्या. अशा वेगवेगळ्या वयोगटातल्या बायकांनी सार्वजनिक ठिकाणी देखील मोकळेपणाने नाच करणे हे आम्ही इतरही अनेक ठिकाणी अनुभवले होते. शाखरीसब्जमध्ये एक प्रौढ बायकांचा ग्रुप त्यांच्या एका लोकगीताच्या ठेक्यावर विन्मुक्तपणे नाचताना बघितला होता. खिवामध्ये सुद्धा भल्या सकाळी काही बायका नाचताना दिसल्या होत्या. खिवाची आमची गाईड म्हणाली होती की आमची गाणी आणि संगीत असे आहे कि ते तुम्हाला नाचायला भाग पाडते. बायकांनी सार्वजनिक ठिकाणी असे सहजपणे नाचणे हे सुंदर तर वाटलेच शिवाय इथल्या सार्वजनिक आणि सामाजिक अवकाशात बायकांना असलेल्या निरोगी स्थानाचा ही त्यातून प्रत्यय आला. 


         (बायकांच्या हातात आम्ही त्यांना खायला दिलेल्या बाखरवड्या आहेत)

समरकंद ते ताश्कंद हा परतीचा प्रवास आम्ही बुलेट ट्रेन मधून केला. २०११ साली सुरु झालेली ही स्पॅनिश बनावटीची रेल्वे सुस्थितीत होती. २५० किमी प्रती तासाचा सर्वोच्च वेग गाठत एकुण साडेतीनशे किमी अंतर आम्ही दोन तासात कापले. उझबेकिस्तानातली एकंदर वाहतूक व्यवस्थेची स्थिती बघता इथे अशी बुलेट ट्रेन असणे थोडे आश्चर्याचे वाटले. कारण इथे वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करताना असे जाणवले होते की काही अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणाचे रस्ते तसे खराब आहेत. अगदी आपल्या रस्त्यांपेक्षाही वाईट. अर्थात त्यांच्या एकंदर पायाभूत सुविधा आपल्यापेक्षा बऱ्या असाव्यात. पण रस्ते मात्र बरे नव्हते. शिवाय रस्त्यांवरून धावणाऱ्या बऱ्याच गाड्या खूप जुन्या वाटायच्या. कार्स तर जास्त करून शेवरोलेट कंपनीच्याच असत. कारण या एवढ्या एकाच कंपनीचा (देवू) कारखाना उझबेकिस्तानात आहे. रस्ते आणि कार्स याबाबत हा देश उदारीकरणापुर्वीच्या भारतासारखा वाटला. जवळपास पंचवीस वर्षे सत्तेची धुरा सांभाळणारे कारीमोव हे तसे पूर्वाश्रमीचे कम्युनिस्ट असल्याने त्यांची धोरणे सोव्हिएत कालीन धोरणांचा प्रभाव असणारीच राहिली असावीत. पण याचाच एक परिणाम म्हणून इथे कुठेच अंगावर येणारी गरिबी दिसली नाही. आपल्याकडे सर्वत्र दिसतात तसे रस्त्यावर फिरणारे भिकारी इथे कुठे दिसले नाहीत.

ताश्कंदला रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आम्ही फरगानाला जाण्यासाठी रवाना झालो. तिएनशान पर्वताची एक रांग ओलांडून आमचा रस्ता जात होता. वाटेत पर्वत रांगेच्या सर्वोच्च ठिकाणी थंडीचा आनंद घेत आम्ही कॉफीचे घुटके घेतले. आमचा पहिला थांबा कोकंदला असणार होता. कोकंद हे फरगाना खोऱ्याच्या पश्चिम बाजूला मोक्याच्या ठिकाणी असलेले शहर आहे. खिवा आणि बुखारा ही शहरे जशी त्या त्या नावाच्या छोट्या स्वतंत्र राज्यांची (खानेट) मध्यवर्ती ठिकाणे होती तसेच कोकंद हे शहर कोकंद खानेटचे केंद्र होते. कोकंद हे सिल्क रुट वरचे एक महत्वाचे ठिकाण होते. पूर्वी सिल्क रूटची एक शाखा कोकंदमार्गे चीनमध्ये काशगरला जात होती. कोकंदला पोहोचत असतानाच आम्हाला एकंदर वातावरणात आणि आजूबाजूच्या परिसरात सुखद बदल जाणवायला लागला होता. कोकंद शहर सुद्धा प्रशस्त, नीटस आणि सुंदर होते. कोकंदमध्ये जास्त वेळ थांबायचे नसल्याने आम्ही आधी थेट तिथला राजवाडा बघायला गेलो. 


                  (कोकंद राजवाड्याच्या समोर आम्ही सगळे दहा जण)

कोकंद खानेट अठराव्या शतकात स्थापन झालेली असल्यामुळे राजवाडा सुद्धा त्या काळातच बांधलेला आहे आणि अगदी विसाव्या शतकातही त्यात नव्या गोष्टींची भर घातली गेलेली आहे. अठराव्या शतकात हा मध्य आशियातल्या सगळ्यात मोठ्या आणि सुंदर राजवाडयांपैकी होता. सध्या मूळच्या एकशे तेरा खोल्यांपैकी एकोणीस खोल्या शिल्लक आहेत आणि त्यातल्या एका दालनात म्युझियम आहे. म्युझियममध्ये फरगाना भागाची प्राचीन काळापासूनच्या इतिहासाची माहिती आहे. इ.स. पूर्व सहाव्या शतकात फरगाना हा सॉग्दियाचा भाग होता आणि इ.स. पूर्व पहिल्या शतकात या खोऱ्यात तटबंदी असलेली पाच सहा शहरे होती.

कोकंदला जेवण करून आम्ही फरगाना प्रांताची राजधानी असलेल्या फरगाना शहराकडे निघालो. वाटेत आजूबाजूच्या हिरवाई मुळे आणि अधून मधून दिसणाऱ्या द्राक्षांच्या आणि इतर फळांच्या बागांमुळे प्रवास करताना डोळ्यांना सुखद गार वाटत होतं. सिर दर्या आणि तिच्या दोन मुख्य उपनद्या खोऱ्यातून वाहत असल्याने खोरे सुपीक आणि समृद्ध आहे.
या खोऱ्याचा बहुतांश भाग उझबेकिस्तानमध्ये मोडतो तर पूर्वेकडचा काही भाग किरगिझिस्तानमध्ये आणि दक्षिणेकडचा काही भाग ताजिकीस्तानमध्ये मोडतो. फरगाना खोरे हे प्राचीन काळापासून उझबेकी, ताजिकी, किरगिझ आणि इतर वंशीय लोकांच्या सरमिसळीचे ठिकाण होते. या भागातला सिल्क रूट चीन पासून जवळ असल्याने या भागात चीनी प्रकारची पण खास इथली काही वैशिष्ट्ये असलेली कुंभारकला (पॉटरी) विकसित झाली. तसेच रेशीमनिर्मितीची कलाही खूप आधीपासून इकडे विकसित झालेली होती. म्हणूनच आम्ही वाटेत रंगीत सिरॅमिक प्रकारातल्या कुंभारकामासाठी प्रसिद्ध असलेल्या रिश्तान नावाच्या गावी तिथली कुंभारकला पाहण्यासाठी थांबलो. 
इथल्या कुंभारकलेला आठशे वर्षांचा इतिहास आहे असे म्हणतात. उझबेकिस्तानातल्या दुकानात विकायला ठेवलेल्या ९० टक्के सिरॅमिकच्या वस्तू या रिश्तानमध्ये तयार केलेल्या असतात. जवळपास हजारेक कारागीर इथे काम करतात. विशेष म्हणजे या वस्तू बनवण्यासाठीची खास वस्त्रगाळ माती या परिसरातच मिळते. आम्हाला इथल्या एका कारखान्यात या वास्तू हाताने कशा बनवल्या जातात याचे सुंदर प्रात्यक्षिक बघायला मिळाले. हाताने फिरत्या चक्रावर तयार होणारी भांडी बघणे हा अनुभव तर छान होताच पण इथल्या कलाकारांना खास या भागातले असे जे नक्षीकाम आहे ते कमालीच्या तन्मयतेने हाताने मातीच्या भांड्यांवर काढताना बघणे नवलाचे होते. भट्टीत भाजल्यानंतर निळे, हिरवे आणि तांबडे रंग येण्यासाठी म्हणून मातीच्या भांड्यांवर विशिष्ठ रसायनात बुडवलेले तीक्ष्ण कुंचले वापरून ही कलाकार मंडळी अप्रतिम असे नक्षीकाम करत होती. काही खास स्थानिक प्रकारचे नक्षीकाम असलेली भांडी विकत घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.          

संध्याकाळच्या सुमारास आम्ही फरगाना शहरात पोहोचलो. प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असल्याने हे शहर देखिल प्रशस्त आणि सुंदर होते. इथे रात्रीच्या जेवणासाठी आम्ही एका रशियन माणसाच्या छोटेखानी रेस्तराँमध्ये गेलो होतो. त्याने स्वतः बनवलेल्या वाईन्स त्याच्याकडे उपलब्ध होत्या. या वाईन्सची चव छान होती. फरगान्याच्या हवापाण्याचा गुण त्यामध्ये उतरला असणार. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एका विस्तीर्ण उद्यानात असलेल्या अहमद इब्न मुहम्मद इब्न काथिर अल फरगाणी या इ.स. 800 मध्ये जन्मलेल्या आणि इथला भूमिपुत्र असलेल्या शास्त्रज्ञांचे स्मारक बघायला गेलो. हा तेंव्हाचा फार मोठा खगोलशास्त्री होता. तेंव्हा त्याने पृथ्वीचा व्यास मोजला होता आणि 861 साली इजिप्तमध्ये नाईल नदीवरचे प्रसिद्ध निलो मीटर बांधले होते. फरगान्याहून वीस किमी अंतरावर रेशीमनिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले मार्गीलन शहर आहे. दहाव्या शतकापासूनची रेशिमानिर्मितीची परंपरा असलेले हे शहर सोळाव्या शतकापर्यंत फरगाना खोऱ्यातले सगळ्यात मोठ्या ठिकाणांपैकी एक होते. इथे आम्हाला हातमागावर रेशमाची वस्त्रे विणण्याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले. उझबेकिस्तानातले खास असे ‘इकत’ प्रकारातले विणकाम असलेले काही रेशमी दुपट्टे आणि कुर्ते आम्ही इथे विकत घेतले.    

मार्गीलनहून आम्ही बाबरचे जन्मगाव आणि पूर्वीच्या फरगाना प्रांताची राजधानी असलेल्या अंदिजान शहराकडे मार्गस्थ झालो. अंदिजान आणि आजूबाजूचा परिसर फरगाना खोऱ्याच्या पूर्वेच्या टोकाजवळ असल्याने जास्त सुंदर वाटला. आधी आम्ही शहराजवळच असलेले बाबराचे स्मारक बघायला गेलो. एका लहानशा टेकडीवर उभारलेले स्मारक तसे छोटेखानी आहे. 

बाबरचा एक पुतळा, एक नव्याने बांधलेली घुमट असलेली इमारत आणि या इमारतीमागे असलेली एक साधी कबर असा हा एकूण साधा मामला आहे. इमारतीच्या भवताली असलेल्या उद्यानाचे आणि सजावटीचे काम अजूनही चालू होते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या स्मारकात बाबरविषयक
पुस्तकांचा संग्रह पहायला ठेवलेला आहे. जगातल्या अनेक भाषेत अनुवादित झालेल्या बाबरनामाच्या प्रती ठेवलेल्या आहेत. बाबर हा स्वतः लेखक होता आणि साहित्याचा भोक्ता होता हे लक्षात घेता पुस्तकसंग्रह ठेवणे हे योग्यच वाटले. नाहीतरी तीनदा समरकंद घेण्याचे अयशस्वी प्रयत्न करणारा आणि इथून पळून गेलेल्या बाबरच्या सैनिकी शौर्याचे इथे फारसे कौतुक नसणे पण स्वाभाविक वाटले.

त्यानंतर आम्ही अंदिजान गावात असणारे बाबरचे जन्मस्थान बघायला गेलो. 



ही तशी मध्यम आकाराची वाडावजा वास्तू आहे. मध्यंतरी भूकंपात पडझड झाल्यानंतर हल्लीच वास्तूचे नूतनीकरण झालेले आहे जे अजूनही पूर्ण झालेले नाही. इथे एक बाबरविषयक माहिती आणि चित्रे असलेले छोटेसे म्युझियम आहे. 
                                  
साहित्यात रस असलेला, बाबरनामासारखा ग्रंथ लिहिणारा, आपल्या जन्मस्थानासाठी हळवेपणाने झुरणारा अशीच बाबरची ओळख इथे लावलेल्या चित्रांमध्ये दिसते.  
    
 फरगाना खोरे पाहताना काश्मीर खोऱ्याची आठवण येते. बाबरला फरगान्याची सारखी आठवण का येत असेल ते समजते. फरगाना खोऱ्याचा विस्तार मात्र काश्मीर खोऱ्याच्या दुप्पट आहे. उंचावर असल्याने सुखद हवा, विविध प्रकारची खास स्थानिक रुचकर स्वाद असलेली फळे आणि सिर दर्याच्या पाण्याने दिसणारी हिरवाई यामुळे हा परिसर रमणीय वाटतो. अर्थात आपले काश्मीर याच्यापेक्षा भारी आहे. बाबर काश्मीरला गेला असता तर फरगान्याबद्दलचा शोक थांबवून तोही कदाचित "गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त. हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त" असं म्हणाला असता. बाबरला इथल्या टरबुजांची फार आठवण यायची. इथले टरबूज आपल्या इतके गोड नाहीत पण खूप लुसलुशीत लागतात. बाबरची आठवण काढत इथे आम्ही भरपूर टरबूज खाल्ले. 

अंदिजान ते ताश्कंद या मार्गावरचा परतीचा सलग प्रवास तसा दमवणारा होता. उशीर झाल्याने आम्ही वाटेतच एका हायवेच्या कडेला असतात तशा मोठ्या दिसणाऱ्या हॉटेलात रात्रीचे जेवण केले. इथे मोठ्या प्रमाणावर कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय म्हणता येतील अशा प्रकारचे लोक जेवायला थांबलेले दिसत होते. इतर अनेक ठिकाणीही आम्हाला भारतीय पर्यटक म्हणून एक आदराची
वागणूक मिळाली होती. पण त्याचा खास प्रत्यय आम्हाला या ठिकाणी आला. उझबेकीस्तानातल्या इतर हॉटेलाप्रमाणे इथेही वेटरचे काम बायका करत होत्या. तर या सगळ्या बायकांनी आम्हा सगळ्यांची इंडियन्स म्हणून विशेष काळजी घेतली. या बायका आणि हॉटेलातील इतरही अनेक लोक भारतीय लोकांना भेटतो आहोत या कल्पनेने उत्साहित झालेले होते. अनेकांनी आमच्या बरोबर फोटो काढले. यांच्याशी बोलताना आमच्या लक्षात आले की येथे बॉलीवूडचे सिनेमे गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. इथल्या टीव्हीवर उपलब्ध असणाऱ्या मोफत वीस चॅनेल्सपैकी एक चॅनेल पूर्णपणे बॉलीवूडला वाहिलेले आहे. हे सगळे चित्रपट आणि गाणी इथे रशियन भाषेत डब करून दाखवले जातात. त्यामुळे अमिताभ बच्चन आणि मिथुनपाठोपाठ इथे शाहरुख सुद्धा लोकप्रिय आहे. आम्हाला मात्र परदेशातल्या लोकांना आपण हवेहवेसे आहोत हा अनुभव सुखावणारा वाटत होता.

सुरुवातीच्या, शेवटच्या आणि अधल्या मधल्या मुक्कामाचे ठिकाण असल्याने ताश्कंद शहराची आम्हाला तशी चांगलीच ओळख झाली होती. उझबेकिस्तान सोडण्यापूर्वी ताश्कंदमधले तैमुरचे

म्युझियम बघणे   प्रसिद्ध चोर्सू बाजारात काही खरेद्या करणे आणि उरलेल्या सोमांच्या नोटांचे ओझे परत देऊन डॉलर्स घेणे अशी काही कामे करायची होती. तैमुरचे म्युझियम अतिशय देखणे आणि उत्कृष्ट होते. तैमुरचा सगळा जीवनपट इथे चित्रे, फोटो, वस्तू आणि मोडेल्सच्या मार्फत उलगडवलेला आहे. एव्हाना आम्हाला हे नीट ध्यानात आले होते की आमच्या मनात असलेली तैमुरची प्रतिमा ही एका विशिष्ट परिप्रेक्षातली आहे आणि या लोकांनी त्याचा देशनायक म्हणून गौरव करावा असे त्याचे कर्तुत्व खचितच आहे. चोर्सू बाजारात रोजच्या खाण्यापिण्यातल्या वस्तूंपासून ते कापडलत्त्यापर्यंत नाना चीजवस्तू उपलब्ध होत्या. 


(म्युझियम मध्ये लावलेला फलक)
एका भल्या मोठ्या घुमटाखाली असलेल्या मोठ्या इमारतीपासून ते खाली जमिनीवर विविध गल्ल्यांमध्ये पसरलेल्या या भल्या मोठ्या बाजारात फिरताना आपल्या इथल्या गर्दीवाल्या बाजारांची आठवण झाली. सोम-डॉलर्स रूपांतराचे रोखीतले काळे व्यवहार करणारे लोक बाजाराच्या कडेलाच उघडपणे आणि सहजपणे त्यांचे उद्योग करत होते. चलनाच्या काळ्या बाजारातल्या व्यवहारासारख्या काही त्रासदायक गोष्टींचा अपवाद वगळता आम्हाला दहा दिवसात झालेले उझबेकिस्तानचे दर्शन तसे फारच सुखावह आणि आनंददायी होते. आपल्याशी जुन्या काळापासून बंध असलेल्या या देशाला आपल्यापेक्षासुद्धा जास्त गुंतागुंतीच्या सांस्कृतिक विणीचा प्राचीन ऐतिहासिक वारसा आहे याची जाणीव हा देश सोडताना होत होती. इस्लामच्या आगमनानंतरही इथे पूर्वीच्या उदार बहुविधतेचे संस्कार जपले गेलेले दिसले होते. सोव्हिएत काळात इथे झालेली आधुनिकीकरणाची प्रक्रिया आधीच्या संस्कारांना सामावून घेत झालेली आहे याचा प्रत्यय इथे आला होता. केमाल पाशाच्या टर्कीमध्ये जसा आधीच्या देशी गोष्टींवर वरवंटा फिरवला गेला होता तसे इथे झालेले नसल्याने, इथे, इथल्या खास देशी अशा गोष्टींचा सुगंध सगळीकडे दरवळत असायचा. या दरवळातले काही गंध हे प्राचीन झोराष्ट्रीयन काळापासूनचे असल्याचे अप्रूप आम्हाला सहलभर वाटत राहिले. शेवटी अक्रमची गळामिठी पद्धतीने भेट घेत त्याचा आणि या बहारदार देशाचा निरोप घेऊन आम्ही ताश्कंद सोडले.  

                                                  (पूर्वप्रसिद्धी: हेमांगी दिवाळी, २०१७)