Friday 20 January 2017

नोटबंदीचे समर्थन: एक तपासणी (१७/१२/१६ रोजीचे टिपण)

नोटबंदीचा निर्णय जाहीर होऊन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला. अजूनही या निर्णयाबद्दलच्या टोकाच्या चर्चा चालू आहेत. एकूण निर्णयाची व्याप्ती आणि प्रभाव पाहता हे स्वाभाविक आहे. यानिमित्ताने होणाऱ्या चर्चा मात्र एकतर इकडची किंवा तिकडची अशी बाजू अटीतटीने मांडणाऱ्या दिसताहेत. पैकी नोटबंदीचे समर्थन करणाऱ्यांना उद्देशून काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न खाली करत आहे.

1) आपल्याला प्रिय असलेल्या नेत्याने, आपल्याला आवडणाऱ्या पक्षाने किंवा आपल्या विचारसरणीशी मिळतीजुळती विचारसरणी असलेल्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आपण समर्थन केलेच पाहिजे अशी काही भावनिक आवश्यकता आपल्याला वाटते काय? अशा भावनिक आवश्यकतेपोटी तर आपण या निर्णयाचे समर्थन करत नाही ना? आपल्या प्रिय आणि आदरणीय अशा व्यक्तीने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांचीे तरी आपण चिकित्सा करू शकलो पाहिजे की नाही? चिकित्सा करणे, चिकित्सक असणे ही जागरूक नागरिक आणि मतदार असण्याची एक महत्वाची अट नाहीय का? या पार्श्वभूमीवर बघता आपण जे नोटबंदीचे समर्थन करतो आहोत ते पुरेशा चिकित्सेनंतर करत आहोत काय? की आपण केवळ भावनिक होऊन प्रतिक्रिया देतोय आणि मत बनवतोय? आपले प्रिय नेते जे सांगताहेत ते आपण पुरेसे तपासून घेत आहोत की नाही? असे करताना आपण त्याबद्दलचे टीकेचे मुद्दे नीटपणे ध्यानात घेत आहोत काय? आपल्या प्रि / आदरणीय व्यक्तीने घेतलेल्या निर्णयाबद्दल टीकात्मक मत बाळगण्याचा अधिकार आपण भावनिकतेपोटी गमावत तर नाहीय ना?

2) नोटबंदीचा निर्णय अनेक बाजू असणारा एकंदर अर्थव्यवस्थेशी संबंध असणारा असा गुंतागुंतीचा निर्णय आहे हे आपल्याला पटते काय? अशा गुंतागुंतीच्या निर्णयाच्या स्वाभाविकच काही जमेच्या बाजू असतात तशाच काही उण्या बाजू असतात. या निर्णयाच्या सगळ्या उण्या बाजू आपल्याला माहीती आहेत काय?

3) नोटबंदीबद्दलच्या प्रतिक्रिया साधारणपणे तीन वर्गात मोडणार्‍या आहेत -
अ) निर्णय योग्य पण अंमलबजावणी सदोष
ब) निर्णय सदोष आणि अंमलबजावणीही सदोष
क) निर्णय योग्य आणि अंमलबजावणीही योग्य
आपली प्रतिक्रिया कुठल्या वर्गात बसते?


4) नोटबंदीबद्दल विरोधी मत बाळगणार्‍यांबद्दल आपले विचार काय आहेत? त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना काय आहेत? खालीलपैकी कोणत्या वर्गात या विरोधी मतवाल्यांना आपण टाकत आहोत?
अ) हे विरोध करतात म्हणजे ह्यांचा काळ्या पैशाला पाठिंबा आहे. हे काळा पैसेवाले आहेत.
ब) हे आमच्या प्रिय/आदरणीय नेत्याचे किंवा पक्षाचे विरोधक असल्यानेच असे मत बाळगतात.
क) हे प्रतिस्पर्धी पक्षाचे समर्थक असल्याने अशी मते व्यक्त करतात.
ड) यांनी मांडलेले विचार मी तटस्थपणे आणि भावनेच्या आहारी न जाता समजावून घेतले. त्यासाठी गरज भासल्यास थोडा अभ्यासही केला. दोन्ही बाजूची मते आणि आकडेवार्‍या तपासल्या. गरज भासल्यास काही तज्ञांशी चर्चाही केली आणि त्यानंतर मी माझे मत बनवले. मला असे आढळले की विरोधी मतवाल्यांची मते चुकीची/सदोष/अपुरी आहेत.


5) अमर्त्य सेन (नोबेल पारितोषिक विजेते, कुठल्याही पक्षाशी बान्धिलकी नसलेले, भारतीय अर्थव्यवस्थेचे अभ्यासक), कौशिक बसू ( पुर्वी जागतिक बॅंकेत अर्थशास्त्रज्ञ तसेच भारत सरकारचे अर्थविषयक सल्लागार), बिमल जालान ( माजी आरबी आय गव्हर्नर), अरूणकुमार (भारतातले काळा पैसा या विषयावरचे तज्ञ, काही दशकांपासून या विषयावर संशोधन करताहेत, काही पुस्तके या विषयावर लिहिली आहेत) या व यासारख्या इतर तज्ञांची मते आपण नीट ध्यानात घेतली आहेत काय? या सगळ्यांनी निर्णयावर टीका केलेली आहे. या टीकेचे मुद्दे आपण तपासलेत काय?

6) सरकार ही जनतेसाठी काम करणारी आणि त्यासाठी जनतेने निवडून दिलेली यंत्रणा आहे. हे सरकार जे निर्णय घेते त्याची योग्ययोग्यता तपासली जाणे आणि त्याची समीक्षा होणे ही लोकशाहीसाठीची एक आवश्यक बाब नाहीय का? असे असताना सरकारच्या एखाद्या निर्णयाबद्दल, या निर्णयाला पाठिंबा देणारे ते सगळे काळा पैसा विरोधी आणि बाकीचे सगळे काळा पैसा समर्थक अशी विभागणी केली जाणे योग्य आहे काय? आमचा निर्णय बरोबरच आहे हे सिद्ध करण्यासाठी मोठ्ठा आटापिटा करणे आणि विरोधी मतांचा कसलाही आदर न करता त्याबद्दल सहानुभूतीशून्य वैरभाव बाळगणे योग्य आहे काय?

7) काळा पैसा म्हणजे काय हे आपण समजावून घेतले आहे काय?

8) काळा पैसा बाहेर येणे म्हणजे काय हे आपण समजावून घेतले आहे काय?

9) काळा पैसा बाहेर आला असे आपल्याला वाटते काय? कशावरून?

10) काळा पैसा बाहेर येईल असे आपल्याला वाटते काय? कशावरून?

11) Centre for Monitoring Indian Economy या संस्थेच्या अभ्यासानुसार नोटबंदीच्या निर्णयाची अंदाजे किंमत 1.28 लाख कोटी इतकी आहे. या किंमतीच्या तुलनेत या रकमेपेक्षा जास्तीचा फायदा होणे आवश्यक आहे असे आपणास वाटते काय? असा जास्तीचा फायदा होणार आहे हे आपल्याला पटले आहे काय? कशाच्या आधारे?

12) डिजिटल/कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल करण्याबद्दल दुमत असल्याचे दिसत नाही. पण ही वाटचाल झटके देणारी, हिंसक आणि आपल्याच काही वंचित बांधवांच्या आयुष्यांवर गंभीर दुष्परिणाम करणारी असावी की सर्वसमावेशक, न्याय्य आणि रास्त (fair) असावी? सध्याची वाटचाल कुठल्या प्रकारची आहे असे आपल्याला वाटते?

13) विरोधी मत व्यक्त करणार्‍यांबद्दल तिरस्काराची/द्वेषाची भावना आपल्या मनात निर्माण होते काय? होत असल्यास ती योग्य आहे काय? सरकारच्या एखाद्या निर्णयाबद्दल वेगवेगळी मते असणे स्वाभाविक असल्याने विरोधी मत बाळगणार्‍यांशी निर्वैर संवाद असायला हवा असे आपल्याला वाटते काय?